विषय : सृष्टी उत्पत्ती विज्ञान
|
विचारधन :- या अध्यायात ‘गुरुपीठ’ पद्धतीचे जनक असलेल्या ‘श्रीगुरुदेव दत्तात्रेय’ यांची पुराणांमध्ये कथन केलेली जन्मकथा सिद्धमुनी नामधारक
शिष्याला सांगतात.
ही जन्मकथा सांगताना
श्रीगुरुचरित्रकार आपल्याला सृष्टी उत्पत्तीविषयक पुराणातील माहिती, प्रथम कथन करतात. ह्यातून श्रीगुरुचरित्रकारांचा विषयाच्या
मुळापर्यंत पोहोचण्याचा दृष्टिकोन (Down to earth aproach) दिसतो.
श्रीगुरुचरित्रकार
सांगतात,’देवांचा प्रमुख इंद्र व अन्य सर्व देवलोक पतिव्रता
अनसूयेमुळे आपले स्वर्गातील स्थान जाईल (?) ह्या शंकेने भयभीत
झाले व त्यांनी तीन मुर्ति ब्रह्मा, विष्णु, महेश यांना यावर उपाय करावा, अशी विनंती केली.’ ह्या विनंतिनुसार ब्रह्मा, विष्णु व महेश अत्रिपत्नी
अनसूयेची सत्त्वपरिक्षा पहाण्यासाठी अत्रीऋषी घरी नसताना अतिथीरुपात आले.
नारदपुराणातील
श्रीदत्तजन्मकथा सांगताना, श्रीगुरुचरित्रकार ह्या कथेतील पतिव्रता
अनसूया हिची सत्त्वपरिक्षा घेण्यामागील घटनेत थोडा बदल करताना दिसतात.
नारदपुराणातील
कथेनुसार ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री, विष्णुपत्नी लक्ष्मी,
महेशपत्नी पार्वती यांना अनसूया या पतिव्रतेचा द्वेष वाटतो आणि त्या
आपआपल्या पतिराजांना अनसूयेकडे तिची सत्त्वपरिक्षा घेण्यासाठी पाठवितात. परंतु मनुष्यस्वभावानुसार कोणतीही व्यक्ती स्त्री अथवा पुरुष आपल्या जोडीदाराला
दुसऱ्याच्या पत्नीकडे किंवा पतीकडे अशाप्रकारे सत्त्वपरिक्षा घेण्यास पाठविणार नाही,
म्हणून श्रीगुरुचरित्रकारांनी ही कथा सांगताना त्यामागील प्रयोजनात
बदल केलेला असावा.
घरी एकटी असलेल्या अनसूयेने तीनही अतिथिंच्या मनातील दुष्ट (मन्मथ खळ )विचार ओळखला. ती स्वतःवरील व स्वतःच्या पतीच्या
तपोबळावर दृढविश्वास ठेवून सत्वपरिक्षेस सामोरी गेली.
अशा ह्या आत्मनिर्भर
अनसूयेपुढे अतिथींच्या मनातील पापभावना हरली व तिचे रुपांतर निष्पाप बालकांच्या स्वरुपात
झाले, असे ही पुराणकथा सांगते.
ह्या तीनही
बालकांसाठी अनसूया उपनिषदे अंगाई गीतात गुंफून गाते. ह्यातून
त्याकाळातील सुशिक्षित, सुसंस्कारी स्त्रीचे रुप दिसते.
अत्रिऋषींना
त्यांच्या स्वतःच्या घरी घडत असलेली ‘अतिथी देवो भव।‘
ही घटना माहित नसल्याने, श्रीगुरुचरित्रकार सांगतात,’श्रीअत्रीऋषी स्वच्छ मनाने घरी आल्यावर अनसूया त्यांना घडलेली गोष्ट सांगते.
श्रीअत्रीऋषी ह्या तीनही बालकांना ब्रह्मा, विष्णु,
महेशाचे रुप मानून नमस्कार करतात.’ ह्या गोष्टीतून
अत्री- अनसूया ह्यांचा पतीपत्नी नात्यातील परस्परांवरील अतूट
विश्वास दिसून येतो.
ब्रह्मा,
विष्णु, महेश ह्या तीनही मुर्ति अत्रीऋषींना
वर मागण्यास सांगतात. तेव्हा श्रीअत्रीऋषी तो मान त्यांच्या
गृहलक्ष्मीला देतात. तेव्हा अनसूया परमेश्वराच्या प्रसन्न होण्याचे
श्रेय स्वतःकडे न घेता, अत्रीऋषींच्या भक्तीला देते.
पतीपत्नीच्या नात्यातील परस्पर हक्कांची जपणूक हे दांपत्य करताना दिसते.
अशा ह्या आदर्श पती-पत्नीच्या
घरी आपला अंश बालक रुपात ठेवून, तीनही देव आपापल्या घरी जातात.
श्रीमद् भगवद् गीतेतील
संदर्भानुसार,
अजः अपि सन् अव्ययात्मा भूतानाम् ईश्वरः अपि सन् ।
प्रकृतिम् स्वाम् अधिष्ठाय सम्भवामि आत्ममायया ॥ ४ - ६॥
अर्थ:- मी स्वतः जन्मरहित आणि अविनाशी स्वरूपाचा असून सुद्धा ; तसेच सर्व प्राणिमात्रांचा ईश्वर असूनही , स्वतःचे मूळस्वरूप आपल्या ताब्यात ठेवून , आपल्याच योगसामर्थ्याने ( मनुष्यलोकात ) जन्म घेतो .
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिः भवति भारत ।
अभ्युत्थानम् अधर्मस्य तदा आत्मानम् सृजामि अहम् ॥ ४ - ७॥
अर्थ:- हे भरतकुलोत्पन्न अर्जुना , जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होऊन अधर्माचे प्राबल्य माजते , तेव्हा तेव्हा मी आपले वेगळेच रूप धारण करतो आणि लोकांसमोर प्रगट होतो
( म्हणजेच मनुष्यरुपात अवतार घेतो) .
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४ - ८॥
अर्थ:- सज्जनांच्या रक्षणासाठी, पापीजनांच्या
नाशासाठी आणि धर्माची प्रस्थापना करण्यासाठी;
मी युगा युगात प्रकट होतो.
अशाप्रकारे परमेश्वराचा
अंश असलेल्या,ह्या बालकांची श्रीअत्री ऋषी व अनसूया यांनी जगरहाटी
प्रमाणे नामकरण केले. त्यांना स्वतःच्या मुलांप्रमाणे लहानाचे
मोठे केले. मातेची
(अनसूयेची) परवानगी घेऊन ह्या मुलांमधील
महेशरुपी ‘दुर्वास मुनी’ अनुष्ठान करण्यासाठी
तीर्थ यात्रेस निघून गेले, ब्रह्मदेवाचा अंश असलेला चंद्र आकाशात
गेला.
विष्णुरुपी ‘दत्त’ ह्या एकाच व्यक्तीत ब्रह्मदेवाचा रजगुण,
श्रीविष्णुचा सत्त्व गुण आणि श्रीशंकराचा तमगुण एकत्रित झालेले आहेत.
ह्या तीनही गुण(रज-सत्त्व–तम) एकत्रित असलेल्या श्रीविष्णुमुर्ति
दत्त यांना श्रीगुरुचरित्रकार आद्य (प्रथम) गुरुपीठ म्हणून गौरवतात. ह्याचाच अर्थ ‘श्रीदत्तात्रेय’ हेच शिक्षणक्षेत्राचे जनक होत.
|
मीमांसा:-
‘श्रीदत्तात्रेय हा
ईश्वराचा मनुष्यरुपातील अवतार आहे’ असे श्रीगुरुचरित्रकार ह्या
अध्यायात सांगतात.
‘ईश्वर’ ह्या
शब्दाची पातंजल योगदर्शनमध्ये असलेली व्याख्या:
क्लेशकर्मविपाकाशयैरपरामृष्टः पुरुषविशेष ईश्वरः।…पातंजल योगदर्शन
१.२४
अर्थ: पाच प्रकारचे क्लेश (अविद्या, अस्मिता,
अनुराग, द्वेष आणि अभिनिवेश); तीन प्रकारचे कर्मविपाक (क्रियमाण कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म) म्हणजे कर्माची पक्वता
होऊन त्यापासून मिळणारे फळ; आशय म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त
वासना या सर्वांशी अपरामृष्ट म्हणजे त्यांच्याशी कसल्याही प्रकारचा संबंध नसलेला
असा जो पुरुषविशेष तो ईश्वर होय.
श्रीदत्तगुरुंनी सर्वप्रथम
अष्टांग योग निर्मिती केली. योगविद्येच्या ह्या
निर्मात्यास योगिराज दत्तात्रेय असे संबोधतात. योग प्रसारक श्रीपातंजल हे योगिराज दत्तात्रेयाचे
शिष्य होते.
श्रीपातंजल ऋषींच्या मते अनुराग, द्वेष
हे क्लेश तसेच व्यक्त- अव्यक्त वासना ह्यांच्याशी कसल्याही प्रकारचा संबंध नसलेला असा जो
पुरुषविशेष तो ईश्वर.
ईश्वर कोपून (रागाने) अनसूयेची अशाप्रकारची सत्त्वपरिक्षा घ्यायला आला होता, हे म्हणणे ईश्वर ह्या व्याख्येत बसत नाही.
त्यामुळे अतिप्राचीन भारतीयांनी, सृष्टी
उत्पत्तीसंबंधी मांडलेल्या अनुमानांवरुन ही कथा गुंफली गेली असावी, हे वाटते. ही सृष्टी उत्पत्तीविषयक अतिप्राचीन अनुमाने
शोधण्याचा हा अल्पसा प्रयत्न :-
‘श्रीदत्तात्रेय जन्मकथा’
श्रीअत्रीऋषी व अनसूया यांच्या कुलवृतांतापासून (दोघांच्या कुलांचा तत्कालिन ज्ञात इतिहास) सुरु होत
नाही.
श्रीगुरुदेवदत्तांची
जन्म कथा सांगण्यापूर्वी श्रीगुरुचरित्रकार वेद कालीन सृष्टी उत्पत्तीविषयीचे गृहितक
सांगतात.
ह्या गृहितकानुसार सृष्टीउत्पत्तीपूर्वी सृष्टी वगैरे काहीही नव्हते. आपः म्हणजे पाणी. सृष्टीनिर्मितीपूर्वी
सर्वत्र जलमय असल्याने वेद ह्या स्थितीला ‘आपोनारायण’
म्हणतात. जगनिर्मितीसाठी ह्या आपोनारायणाने सोनेरी
अंड्याची निर्मिती केली. त्याचे नांव ब्रह्मांड झाले. त्याच ब्रह्मांडाची फुटून शकलांची जोडी (दोन शकले) झाली. एक आकाश व एक भूमी होऊन दोन्ही शकले उभी राहिली.
रजोगुणाने ब्रह्मदेव निर्माण झाला. त्याला ‘हिरण्यगर्भ’ नाव प्राप्त झाले. सृष्टीचा रचनाकार हाच
ब्रह्मदेव होय.
ह्या सर्व वर्णनावरुन
पुराणपूर्वकालात भारतीयांना सृष्टीनिर्मितीपूर्वीची स्थिती ज्ञात असावी, असे दिसते.
ह्या माहित असलेल्या निरिक्षणांच्या आधारे, पुराणांची
निर्मिती झालेली असावी. इतिहासकथन करण्यासाठी श्रीगुरुचरित्रकारांनी
पुराणकथा ओवीबद्ध केलेल्या दिसतात.
ब्रह्मांड हे सोनेरी
अंडे घनरुप सांगितलेले आहे. त्याची दोनही शकले घनरुप असू शकतात. भूमी ही घनरुप
आहे परंतु आकाश हे पृथ्वीभोवतालचे वायू व धूळकण यांचे पोकळ आवरण आहे. त्यामुळे भूमी व आकाश (घनरुप नसल्याने) ही ती दोन शकले असावीत, असे म्हणणे संयुक्तिक वाटत
नाही.
आधुनिक विज्ञान
निरिक्षणांनुसार स्फोटांमधून सौरमालेची निर्मिती झालेली असावी. ह्याचाच अर्थ ब्रह्मांड फुटून त्याची शकले झाली.
श्री. इव्हान रामीरेझ, टेक्सास विद्यापीठ, अमेरिका यांनी ‘अॅस्ट्रॉफिजिकल जर्नल’ ह्या नियतकालिकात आपल्या सूर्याचे भावंड असलेल्या ताऱ्याचा शोध प्रसिद्ध
केलेला आहे. हा महाकाय तारा ज्या धूळ व वायूच्या मिश्रणातून
आपला सूर्य जन्मला तेथेच जन्मला आहे. सूर्याचे भावंड असलेल्या
या ताऱ्याचे नाव एच डी १६२८२६ असे ठेवलेले असून हा तारा आपल्या सूर्यापेक्षा १५पट
जास्त वस्तुमानाचा आहे व तो शौरी तारकापुंजात आहे. ह्या ताऱ्याभोवती
पृथ्वीसारखे ग्रह असू शकतात, असे शास्त्रज्ञांना वाटते.
असे सूर्यसदृश्य अजून तारे आहेत का? व त्यांच्या सभोवतालची सौरमाला कशी आहे?
याच्या शोधातून ब्रह्मांडाची किती शकले झाली असावीत ? ह्याची माहिती मिळू शकेल.
त्यानंतर सुरवातीच्या
अवस्थेत काही ग्रहांची एकमेकांशी टक्कर होऊन त्यांचे तुकडे झाले. त्यातून पृथ्वी व पृथ्वीवरील जीवसृष्टी तयार झाली असावी, असे शास्त्रज्ञ श्री. इव्हान रामीरेझ यांचे मत आहे.
आधुनिक विज्ञानाच्या
मते, पृथ्वीच्या जन्माच्यावेळी मंगळसदृश्य भौगोलिक वस्तु पृथ्वीवर
आदळून, पृथ्वी ह्या ग्रहाचा एक भाग चंद्र रुपात, पृथ्वीचा उपग्रह म्हणून निर्माण झालेला असावा.
अशा ह्या मंगळसदृश्य ग्रहाची पृथ्वीशी
झालेली जबरदस्त टक्करीचा अर्थ : तत्कालिन
मानवाने परमेश्वर कोपला व अनसूयेची सत्त्वपरिक्षा पहाण्यास आला, असे मानले असावे.
ह्या भौगोलिक टक्करीतून
झालेल्या चंद्र निर्मितीनुसार, चंद्र हा पृथ्वीचा पुत्र होतो.
पुराणकथांमध्ये चंद्राच्या मातेचे नाव अनसूया म्हणजे ‘असूया नसलेली’ असे आहे. ही अनसूया
म्हणजे आपली पृथ्वी मानले, तर श्री अत्री ऋषी म्हणजे निश्चित
कोण ?
श्रीअत्री व अनसूया ही जोडी
अनेकदा वेदांमध्ये दिसते.
श्रीअत्री ऋषींचे दोन जन्म वेदांमध्ये सांगितलेले आहेत.
(संदर्भ:- ॥श्रीदत्तात्रेय
ज्ञानकोश॥ लेखक : डॉ. प्र. न. जोशी, प्रकाशक : श्रीदत्तात्रेय ज्ञानकोश प्रकाशन, पुणे)
श्रीअत्री ऋषी यांच्या जन्मासंबंधी
वेदांतील प्रथम उल्लेख:
ह्यातील एका कथेनुसार ब्रह्मदेवाच्या
नेत्रातून झालेला पुत्र, तो अत्री असे मानले जाते.
नेत्र (डोळा) हे प्रकाशाचे
ज्ञानेंद्रिय आहे. अत्री हे नाव पृथ्वीवर येणाऱ्या प्रकाशाशी
संबंधीत असावे.
‘अनसूया’ ही कर्दमऋषींची मुलगी. कर्दम ह्या शब्दाचा अर्थ चिखल.
हा चिखल वाळून घट्ट झाल्यावर, त्यापासून निर्माण
झालेली पृथ्वी म्हणजे अनसूया.
अशी ही अनसूया पृथ्वी
व ब्रह्मदेवाच्या नेत्रातून आलेला अत्रि (प्रकाश) ह्यांच्या संयोगातून पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झालेली असावी, असे म्हणणे गैर होणार नाही.
विष्णुपुराणात ‘भगवान’ ह्या शब्दाची सांगितलेली व्याख्या :
उत्पत्तिम्
प्रलयम् च एव भूतानाम् आगतिम् गतिम्।
वेत्ति विद्याम् अविद्याम् च सः वाच्यो भगवान् इति॥……विष्णु पुराण
६.५-७८
अर्थ: समस्त प्राणिमात्रांची उत्पत्ति, वृद्धि आणि लय या अवस्था; समस्त प्राणिमात्रांचे
वेगवेगळ्या व्यक्त रुपात पृथ्वीतलावर येणे आणि जाणे; तसेच विद्या
आणि अविद्या यांना जो यथार्थपणे जाणतो त्याला भगवान् म्हटले जाते.
ह्या व्याख्येनुसार श्रीकृष्ण, परशुराम
इत्यादि मनुष्यरुपातील परमेश्वरी अवतारास, आपण भगवान संबोधतो.
ईश्वरनिर्मित सृष्टी ही देवाने दिलेली म्हणून ‘दत्त’ मानल्यास,
त्या जीवातील आत्मा म्हणजे ‘दुर्वास’ म्हणता
येईल.
अनसूया पुत्र : दुर्वास ह्या शब्दाचा अर्थ :-
दुर्वास = दुः + वास
वास = वस्त्र. ज्याची वस्त्रे अयोग्य आहेत, असा आत्मा
श्रीमद् भगवद् गीतेतील अध्याय दुसरा श्लोक, क्रमांक २२ नुसार आत्मा ह्या शब्दाची व्याख्या :
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरः अपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही ॥ २ - २२ ॥
ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी वस्त्रे घालतो ; त्याचप्रमाणे आत्मा जुनी शरीरे टाकून , दुसऱ्या नव्या शरीरात प्रवेश करतो.
ह्याचाच अर्थ देह ह्या अयोग्य वस्त्रातील घटक तो आत्मा होय.
दुर्वास मुनी हा श्रीशंकराचा अंश मानलेला आहे.
अनसूया पुत्र : ‘दत्त’
दत्त हा विष्णुचा अंश मानलेला आढळतो.
श्रीब्रह्माण्डपुराणातील श्रीविष्णुपञ्जरस्तोत्रात श्रीविष्णुचे वर्णन पुढीलप्रमाणे
दिलेले आहे,
जले विष्णुः थले विष्णुः
विष्णु पर्वतमस्तके।
ज्वालमालाकुले विष्णुः सर्वविष्णुमयं जगत्।।
अर्थ: पाणी, जमीन,
पर्वत, ज्वालामुखी तसेच सर्व जग विष्णुमय आहे.
वरील श्लोकांच्या अर्थानुसार सजीव,निर्जीव सर्व सृष्टी म्हणजे ‘दत्त’ असे म्हणता
येईल.
अनसूया पुत्र :
चंद्र
पृथ्वीनिर्मीतीच्या वेळी
निर्माण झालेला ‘चंद्र’ हा अनसूयेचा पुत्र आकाशात गेला. चंद्र
पृथ्वीचा उपग्रह असल्याने युगानुयुगे पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना दिसतो.
स्वाभाविकच आपल्या मातेचे (अनसूयेचे)
पुत्र चंद्र रोज दर्शन घेतो.
अशाप्रकारे श्रीदत्तजन्म कथेतील शब्दांचे अर्थ आपल्याला तत्कालिन ज्ञात असलेले
भौगोलिक अनुमान सांगताना आढळते.
श्रीअत्री ऋषी यांच्या जन्मासंबंधी वेदांतील द्वितीय उल्लेख:
पृथ्वीवर येणाऱ्या प्रकाशाचे
मूळ स्त्रोत असलेल्या सूर्याचे एक नाव ‘हिरण्यगर्भ’
आहे.अशाच प्रकारचा प्रतिसूर्य असलेला, प्रजापती व वाग्देवी ह्यांचा
पुत्र म्हणजे अत्री होय, असा श्रीअत्री ऋषी यांच्या जन्मासंबंधी
उल्लेख वेदांमध्ये आढळतो.
(संदर्भ:- ॥श्रीदत्तात्रेय ज्ञानकोश॥ लेखक :
डॉ. प्र. न. जोशी, प्रकाशक : श्रीदत्तात्रेय
ज्ञानकोश प्रकाशन, पुणे)
प्रजापती श्रीअत्री ऋषी ह्यांनी स्वराज
रक्षणासाठी नीती, नियम आचारधर्म व कायदा सांगणारे अत्री
स्मृती व अत्री संहिता हे दोन ग्रंथ लिहीलेले आहेत.
त्यांच्यामते ‘स्वराज्य रक्षण’ हे
एकट्या दुकट्याचे काम नाही. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन
बहुविध उपायांनी स्वराज्याचे रक्षण केले पाहिजे.
श्रीअत्री ऋषींच्या मते स्वराज्य मिळविणे अवघड व मिळविलेले
स्वराज्य टिकविणे त्याहूनही कठीण. स्वराज्य
टिकविण्यासाठी लोकांनी सतत सावध असले पाहिजे. एकदा स्वराज्य मिळाले की लोक हळूहळू संकुचित
स्वार्थी होत जातात या स्वार्थापायी समाजात भ्रष्टाचार वाढत जातो.अत्यंत अवघड असा लढा देऊन आपण १९४७ साली इंग्रजीसत्तेकडून स्वराज्य
मिळविले, परंतू आज २०१४ साली आपला देश भ्रष्टाचाराने पोखरला जाताना दिसतोय.
श्रीअत्रीऋषींना ऋगवेदांत पांचजन्य म्हणून गौरविलेले आहे. त्यांनी
त्याकाळी वाद तंटे मिटविण्यासाठी पंचमंडळे नेमली. त्या
पंचमंडळांचे ते सरपंच असत.
अशा ह्या लोकशाहीवादी
भ्रष्टाचार निर्मुलक श्रीअत्रीऋषींना तत्कालीन समाजकंटकांकडून ऋबीसमध्ये सहपरिवार टाकले असावे. ऋबीस म्हणजे तत्प अग्नीकुंड. हे ऋबीस भाताच्या
कांडून शिल्लक राहिलेल्या तुसाचे ढीग चोहोबाजूंनी करून बनवित. असे हे सर्व बाजूंनी असलेले ऋबीसांतील तुसाचे ढीग पेटविले असता, धुमसून - धुमसून जळत त्यातून ज्याळा निघत नसत, परंतु धुमसणाऱ्या ढीगाची दाहकता आंत
कोंडलेल्या व्यक्तीस प्राणांतिक शिक्षा देत असे.
ऋगवेदातील पहिल्या मंडळातील ११६व्या सुक्तातील आठव्या ऋचेत अश्विनीकुमारांनी
अत्री ऋषींना ऋबीसांतून वाचविल्या बद्दल धन्यवाद दिलेले आहे.
एवढा प्रचंड
समाजकंटकांचा विरोध झाला तरी प्रजापती म्हणून आपले काम अत्री ऋषींनी भारतभर आश्रम स्थापून केलेले
दिसते. अत्री ऋषींचे आश्रम जम्मू काश्मीर, हिमालयात गंगोत्रीच्या
मार्गावर विंद्य व सातपुड्याच्या दक्षिणपूर्व भागांत ऋक्ष पर्वत, रामायण काळांत चित्रकुट पर्वत संह्याद्री पर्वतरागांतील माहूरगड तसेच
रैवतक म्हणजे सध्याचा गिरनार पर्वत नर्मदा नदीच्या उत्तरेला खंबायत आखाताजवळ
महीनदी समुद्रास मिळते त्या महीसागर संगमावर, दक्षिण भारतात त्रिवेन्द्रम व कन्याकुमारी
यामध्ये असलेल्या शुचीन्द्र क्षेत्री असे भारतभर स्थापिलेले दिसतात.अशाप्रकारे अत्री ऋषींनी काश्मीर ते कन्याकुमारी असे पूर्ण भारतवर्षात
प्रवास करुन ठिकठिकाणी आश्रम स्थापून ब्रह्मदेवाने दिलेली प्रजापती म्हणून
जबाबदारी पार पाडलेली दिसते.
श्रीअत्री ऋषींच्या काळातही अतिवृष्टी दुष्काळ हे लहरी
मान्सूनचे प्रश्न असावेत.
ऋगवेदातील पाचव्या मंडलाचे नाव अत्री मंडल आहे.
ह्या अत्री मंडलात पर्जन्यसुक्त दिलेले आहे. ह्या मंडलात
खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ग्रह
नक्षत्रांच्या स्थिती-गती,
सूर्यग्रहण तसेच पावसाची अतिवृष्टी
अनावृष्टी कशी टाळावी ? ह्या निसर्गासंबंधी गोष्टींचा
अभ्यास होत असे.
श्रीअत्री ऋषींनी खग्रास ग्रहणावर केलेल्या नोंदीनुसार लोकमान्य
टिळकांनी त्यांच्या ओरिअन ह्या पुस्तकात गणिताच्या सहाय्याने माहिती दिलेली आहे. ही माहिती व ऋगवेदातील अत्री ऋषींनी
चित्रकुट परिसरातून पाहिलेल्या सूर्यग्रहणाच्या नोंदी ह्यांचा अभ्यास
कॉम्प्युटरवर आधुनिक पध्दतीने खगोल शास्त्रज्ञांनी केला असता, हे खग्राह सूर्य ग्रहण साधारण इसवी सनापुर्वी ४६७७ ह्या वर्षांत घडले
असावे, म्हणजे ही घटना अंदाजे ७००० वर्षे पुरातन असावी.
श्रीअत्री - अनसूया ह्यांना दत्त, दुर्वास, सोम (चंद्र),
अर्यमा हे चार मुलगे व अमला ही मुलगी अशी अपत्ये झाली, वेदकालात असा उल्लेख आढळतो.
(
संदर्भ:- ॥श्रीदत्तात्रेय ज्ञानकोश॥ लेखक : डॉ. प्र. न. जोशी, प्रकाशक : श्रीदत्तात्रेय
ज्ञानकोश प्रकाशन, पुणे)
ह्यातील दुर्वासमुनी हे शीघ्रकोपी ऋषी,अत्यंत विद्वान होते. ते शिवाचे अवतार
मानले जातात. महाभारतात ह्या दुर्वास मुनींचा उल्लेख आहे.पूर्वी ऋषीमुनी तीर्थक्षेत्री समाज कल्याणासाठी अनुष्ठान करीत असत.
आजही शीघ्रकोपी
(short tampered )व्यक्तीस ‘दुर्वास’ह्या नावाने आपण संबोधतो.
सोम म्हणजे चंद्र,
हा चांद्रवंशीय क्षत्रिय राजकुलाचा आद्य पुरुष असल्याचा उल्लेख प्राचीन
साहित्यात आढळतो.
दत्त ह्या अत्रिपुत्रास ‘आद्य गुरु पीठ’ म्हणून श्रीगुरुचरित्रकार संबोधतात.
शिक्षण क्षेत्र ही श्रीदत्तगुरुंची जगाला दिलेली देणगी आहे.
श्रीदत्तात्रेयाने
निसर्गाच्या सानिध्यातून निसर्गाला गुरु केलेले दिसते. ह्या पृथ्वीवरच्या सृष्टीतील २४ गोष्टींना
गुरु करुन सृष्टी विषयक जाणीवा निर्माण करण्याचे काम जगांत प्रथमतः श्रीदत्तात्रेयाने केले, हे श्री. मार्टीन हाय ह्या ओक्सफर्ड
युनिव्हर्सिटीतील भूगर्भ शास्त्रज्ञाने २००७ साली कॅनेडिअन जर्नल मध्ये शोधनिबंध
लिहून जगासमोर मांडले आहे. ह्या भूगर्भशास्त्रज्ञाच्या मते पर्यावरणाचे संरक्षण करण्याची प्रथम
जाणीव श्रीदत्तात्रेयाने जगाला दिली. आजच्या युगांत आपण
प्रदुषण पर्यावरण मित्र वगैरे संकल्पनांचा सतत उहापोह निसर्ग जपण्यापेक्षा जास्त
करीत असतो, परंतु श्रीदत्तात्रेयाने ह्या निसर्गालाच
पुज्यनीय अशा गुरुस्थानी ठेवले.
श्रीअत्रि अनसूयेचा मुलगा
अर्यमा व मुलगी अमला ह्यांची इतिहासाने घेतलेली नोंद आम्हाला मिळालेली
नाही.
संशोधकांच्या मते,
माहुरगड ह्या ठिकाणी ‘श्रीदत्त जन्म कथा’
घडलेली असावी. महाराष्ट्र शासनाने माहुरगडास
‘श्रीदत्त जन्म स्थान’ म्हणून मान्यता
दिलेली आहे.
॥ श्रीगुरुदेवदत्त॥
|
No comments:
Post a Comment