Wednesday 23 December 2015

‘ जगजेठी दत्तराया ’

                                (चाल : श्रीकृष्ण परमात्मा)
अविनाशी एक असशी
जगी तूची दत्तराया --- ॥धृ॥
वसतोसी गाणगपूरी
दिसतोसी औदुंबरी
वाडी गावी नरहरी
भरलासी त्रिभुवनीया -- ॥१॥
अविनाशी एक असशी
जगी तूची दत्तराया --- ॥धृ॥

सती अनसुयेपोटी
जन्म घेसी जगजेठी
तारावया जनासाठी
अवतरलासी सिद्धराया -- ॥२॥
अविनाशी एक असशी
जगी तूची दत्तराया --- ॥धृ॥

ह्या विकल्प संकल्पात
मन हेची बावरत
नसे शुद्धी चित्तात
अवधूत सावळीया -- ॥३॥
अविनाशी एक असशी
जगी तूची दत्तराया --- ॥धृ॥

कृपा करी गुरुनाथ
झणी पाजी बोधामृत
तव विश्रांती सदनांत
रंगवी राधेला या -- ४॥
अविनाशी एक असशी
जगी तूची दत्तराया --- ॥धृ॥
               ------ कै. राधाबाई आठवले

पूर्वीपासून श्रीगुरुचरित्र महिलांनी वाचू नये, हा प्रवाद आपल्याकडे आहे. माझ्या आजीच्या पोथीसंग्रहातील श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ आजही आमच्याकडे आहे. माझ्या आजी- आजोबांना मी पाहिलेले नाही, परंतु माझ्या बाबांच्या सांगण्यानुसार पोथी-पुराण, पूजा-अर्चा ह्यांपासून माझे आजोबा (कै. दत्तात्रय आठवले) कैक योजने दूर होते तर देवभोळ्या असलेल्या आजीला (कै. राधाबाई आठवले) पोथी पुराणे वाचून अक्षर ओळख झाली.
‘जगजेठी दत्तराया’ ह्या काव्यचित्रातून माझ्या आजीची व्यक्त होणारी दत्तभक्ती.
अनुराधा आठवले (घाणेकर), नासिक

Monday 21 December 2015

‘गीता साद घाली मना’


काहीतरी करायचे आहे, वाटे एक जाणीव ।
स्वकर्मी भासू नये, वाटतसे कोणतीच उणीव ॥
जन्म, काल, वेळ, कुळ नसे आपुल्या स्वाधीन ।
म्हणून म्हणती मानव जन्म असे केवळ पराधीन ॥
जन्म समयी लाभे मातेस मातृत्व, पित्यास पितृत्व  ।
तव अस्तित्वासाठी जपावे, सदैव तू सत्व॥
ईशदर्शन प्राप्तीचे साधन म्हणूनी करीशी भक्ती ।
ईश हा नसे दृश्य पण ती असे अचाट शक्ती ॥
पूजाअर्चाद्वारे न मागणे काही देवापाशी ।
म्हणून म्हणती ‘न मागे तयाची रमा होय दासी’ ॥
पूजा अर्चा उपासनेतून साधते मनाची एकाग्रता ।
स्वकर्मातून मिळते खचित मनाची नम्रता ॥
एकाग्री मन सांगे, सार चंचलता दूर दूर ।
मग जीवन मार्गी न राहील, कोणतीच हूरहूर ॥
दैनंदिन  आचार-विचार उच्चारातून प्रगटे स्वकर्म  ।
संस्काराचे शिंपण होता, स्वकर्म बने स्वधर्म ॥
धर्म दावितो सन्मार्गी समाजधारणा – प्रवृत्ती ।
समाजधारणेतून उत्कटते सामाजिक प्रवृत्ती ॥
धर्माचे थोतांड माजवून नको पोसू अहम् ।
सत्कर्म करुनी वर म्हणावे ‘इदं न मम’  ॥
नवससायातून ठेवू नये कधी अंधश्रद्धा ।
मनःशांतीस्तव सत्कर्मी ठेवावी अढळ श्रद्धा ॥
स्वधर्मातून पोसतो वाढतो स्व आवडीचा छंद ।
स्वकर्मातून लाभे सदैव अविरत नवनिर्मिती आनंद ॥
स्वकर्मे धरु नये, मनी फलाची आशा ।
असफल कर्मातून पदरी पडते, घोर निराशा  ॥
निराशेतून मनी भीषण उद्विग्नता प्राप्त होते ।
बदलता वातावरणी रुप होत्याचे नव्हते होते ॥
प्रयत्ने रगडिता वाळूचे तेलही गळे ।
सत्कर्मी लाभती सफलतेची फळे ॥
फलाशेतून स्वकर्माची निष्टा भंग पावते  ।
लाभासाठी चंचल मन अखंड धावते ॥
कुरुक्षेत्री महाभारत घडले कुटुंबकलहापायी ।
भाऊ बंदकीतून वैराची ठिणगी फुलते ठायी ठायी ॥
कलहसमयी समेट करण्या पुढे धावला भगवंत ।
सार्वभौम सत्तेची नशा, सत्तेस करी नाशिवंत ॥
भगवंत बोले, अर्जुनाशी “धरी रे शस्त्र हाती” ।
क्षात्रतेज जपण्या, विसर रक्ताची नाती ॥
आठव तुझा रणांगणी पराक्रमी गत इतिहास ।
आसक्तीपायी भ्याडमनी नको, स्वीकारु उपहास ॥
जगा त्रासूनी लोक स्वीकारती संन्यासधर्म ।
सर्वसंग परित्यागातून न सुटे कदापि स्वधर्म ॥
वनवासी अन्न –वस्त्र - निवारा गरजा न सुटती  ।
स्वरक्षणार्थ रानी भयभित चित्ती अनेक वाटा फुटती ॥
संन्यास नसून भासे हे निव्वळ संन्यास सोंग ।
आत्मवंचना का करतोस ? ही फसवी सोंग ढोंग ॥
प्रपंच करावा नेटका राहून प्रपंची ।
विरक्तीच्या गप्पा, करु नको पोपटपंची ॥
सावंतामाळी प्रपंची फुलवितो भाजीचा मळा ।
स्वकर्मातून नामस्मरणाचा गातो सुस्वर गळा ॥
नामयाची जनी अखंड करीते, कांडण- दळण ।
स्वकर्मातून नामस्मरणी लाविते, इंद्रिया- वळण ॥
स्वकर्म संपता ज्ञानदेव जाहले समाधीस्त ।
जन म्हणती जाहला ज्ञानसूर्याचा अस्त ॥
अस्त नसे हा स्वकर्मपूर्तीचा दिव्य संदेश ।
संदेश ह्या विश्वात व्यापून रहावा हाच आदेश ॥
मातृपितृ सेवेत गढला, पुंडलिक धुंद – दंग ।
प्रसन्न वदनी उभा ठाकला, वीटेवरी पांडूरंग ॥
गीतावचने सांगती, स्वकर्मयोगाची महती अगणित ।
स्वकर्मातून जीवनी सुटावे, जीवनाचे अवघड गणित ॥
धर्म कल्पना गाते, निव्वळ मानवतेची कवन ।
मानवधर्म एक, पण अनेक पंथ उद् घोषती संतवचन ॥
व्यक्ती व्यक्ती गणिक समाजी दिसे स्वधर्म अनेक  ।
सदाचार सोडून सत्तांध -मदांध वागती सोडून विवेक ॥
पैसा - पैसा करुनी जमविती अगणित मालमता  ।
मालमता हव्यासापोटी लाथाडती नीतिमत्ता ॥
लोकशाहीसाठी भल्या मारती लंब्या  बाता ।
सत्ता प्राप्त होता मारती मत्त गर्दभापरी लाथा ॥
मतासाठी केविलवाणे वदूनी होती सर्व लीन ।
स्वार्थासाठी सत्तांध बनूनी करीती जनता हीन – दीन ॥
ही नव्हे लोकशाही ही तर भासे हुकुमशाही ।
अनिर्बंध सत्तेसाठी बने ही पुरी घराणेशाही ॥
युद्धभूमी नव्हे ही तर कर्मभूमी बोले, श्रीकृष्ण परमात्मा ।
मनःशांतीस्तव रातंदिन तळमळे हरएक आत्मा  ॥
नको वाचन भगवद् गीता, नको करु नुसते पाठांतर  ।
संस्कारित कर्मापासून जीवात्म्याला दे ऊ नको अंतर ॥
गीता सांगे देह क्षणभंगूर असे आत्मा अमर ।
देहासक्तीपायी का उगीच माजवितो सदैव समर ॥
                       -----------प्रभा आठवले, नासिक


संदर्भ :- http://bhagawad-geeta.com/

Saturday 12 December 2015

स्मार्ट सिटी : नाशिक पार्श्वभूमी


                            ‘स्मार्ट सिटींचे शतक’ ह्या प्रक्लपाने येणाऱ्या संगणकीय युगाची नांदी देत, इसवी सन २०१५ आपला निरोप घेत आहे. २०१६ साली प्रवेश करणाऱ्या ह्या नवयुगाच्या दिंडी दरवाजात उभे असताना, सर्वसामान्य माणसाचे मन स्मार्ट सिटीतील महागाईच्या भस्मासूराने साशंक होते. स्मार्ट सिटीचे हे आव्हान पेलताना आपल्याकडे निधीची कमतरता व स्वयंभू तंत्रज्ञानाचा असलेला अभाव यांची प्रकर्षाने जाणीव होते.
                   कालचक्र हे अविरत फिरत असते. प्रत्येक गावाचा चेहरामोहरा त्या काळानुरुप बदलत असतो. आपल्या नाशिकने जलभूमी, नाशिक भूमी, मंत्रभूमी (नासिक तीर्थक्षेत्र), यंत्रभूमी (औद्योगिक क्षेत्र) अशी स्थित्यंतरे अनुभवलेली आहेत.
 १) जलभूमी :-
               ब्रह्मपुराणातील वर्णनानुसार तसेच भूगर्भ शास्त्राच्या अनुमानानुसार, सुमारे ६.८कोटी वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीतून ब्रह्मगिरी पर्वताची निर्मिती झालेली असावी. ह्या ज्वालामुखीचे ब्रह्मपुराणांत खूप सुंदर वर्णन आहे. ब्रह्मदेव सांगतो,”मी दंडकारण्यात केलेल्या यज्ञात, वर्षा ऋतू ब्रह्मगिरी पर्वतावरील कुशात (कुश= दर्भ= एक प्रकारचे गवत) ठेवला.”
ब्रह्मपुराणातील नोंदीनुसार, नाशिक क्षेत्री अरुणा व वरुणा ह्या दोन नद्यांचे संगमस्थान होते. ह्या संगमातून गंगा नदी आजची ‘दक्षिणवाहिनी गंगा’ उगम पावत होती.
{ ६.८ कोटीवर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीस सृष्टी निर्माण कर्त्या ब्रह्मदेवाचा यज्ञ म्हणणे सुयोग्य आहे.
ब्रह्म पुराण अध्याय ८९ श्लोक क्रमांक ४५ नुसार
अरुणावरुणानद्योर्गड्गायां संगमः शुभः।
देवानां तत्र तीर्थानामागतानां पृथक्पृथक्॥८९-४५॥
              ह्या श्लोकाचा अर्थ आहे, अरुणा व वरुणा ह्या नद्यांच्या संगमस्थानी गंगा नदीचा होणारा संगम शुभ आहे. त्या ठिकाणी त्या संगमस्थानी देव परत-परत येत असत. }
                    ‘नाशिक हे तळ्यांचे क्षेत्र होते’ असे मेरी (M.E.R.I.,Nashik) नासिक येथून सेवानिवृत्त झालेले भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. रत्नाकर पटवर्धन यांचे संशोधन सांगते.
२) नाशिक भूमी :-
                      अरुणा-वरुणा संगम असलेल्या ह्या जलभूमीतून  अरुणा नदी लुप्त झाली.
{  अरुणा नदी कशी लुप्त झाली ? हा पुरावा मिळालेला नाही.
    आजही नाशिकमध्ये १५ ते २० फूट खोलीवर पाणी लागते.
   ‘वरुणा नदी कुशावर्ती।‘ असे श्रीगुरुचरित्रकार अध्याय १५व्यात  
    सांगतात. }
                      पाणलोटाने वाहून आलेल्या प्रचंड मातीने नाशिक क्षेत्री टेकड्यांची निर्मिती झालेली असावी. नव शिखांमध्ये वसलेले क्षेत्र नाशिक हे नामकरण भूतकालीन टेकड्यांचे अस्तित्व दर्शविते.
                   नाशिक येथील मातीत CaCO3असल्याने ही काचसदृश्य चिकण माती आहे. मातीचे गंगापूर धरण तसेच जुन्या नाशिकमधील मातीचे वाडे नाशिकमध्ये आढळाणाऱ्या चिकण मातीचे पुरावे होत.
              पुराणातील उल्लेखानुसार, गौतम ऋषींनी गोदावरी नदीचा उगम शोधला. गौतम ऋषींच्या रुपाने जगाला  भूगर्भ शास्त्रज्ञ मिळाला, असे दिसते.
                    त्रिंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर पसरलेल्या लाव्हारसांत पावसाचे पाणी धरुन ठेवण्याची क्षमता आहे. ब्रह्मगिरी पर्वत शिखरावर गोदावरी व वैतरणा ह्या नद्यांचा उगम होतो.
 ३) नासिक :  तीर्थक्षेत्र
                          रामायणकाळात शूर्पणखेचे नाक (नासिका) लक्ष्मणाने कापल्याने नाशिकचे नाव ‘नासिक’ असे झाले असावे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे  क्षेत्र, तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता पावले.  विधीवत धर्मकृत्ये, तांब्या-पितळेची भांडी, शुद्ध नाशिक चांदी, द्राक्ष, कांदा तसेच नाशिकचा चिवडा अशा व्यवसायातून नाशिकची देशात ओळख निर्माण झाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा  स्वातंत्र्य सेनानी नाशिकने भारतभूमीला दिला.
                         स्वतंत्र भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी लागणारे क्षात्रतेज भावी पिढीत निर्माण करण्यासाठी धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे  ह्यांनी  भोसला मिलिटरी स्कूलची नासिक तीर्थक्षेत्री स्थापना केली.
 ४) यंत्रभूमी (औद्योगिक क्षेत्र) :-
                   पद्मश्री बाबूभाई राठी, मामा शुक्ल, मामा अनगळ, बाबा वढावकर, प्रेमजीभाई वरीया अशा अनेक ज्ञात अज्ञात द्रष्ट्या नाशिककरांच्या प्रयत्नातून N.I.C.E. सातपूर नाशिक येथे औद्यौगिक क्षेत्र निर्माण झाले. त्रिंबकरोडवरील भोसला मिलिटरी स्कूल जवळील ह्या जागेवर पूर्वी माळरान होते. दुसऱ्या महायुद्ध काळात ब्रिटिशांनी सातपूर येथील माळरान असलेल्या टेकड्यांवर आफ्रिकन सैनिकांचे कॅम्प येथे उभारले होते.
                    त्रिंबक रोडवरील सातपूर तसेच जुन्या मुंबई आग्रा रोडवरील अंबड ह्या औद्योगिक वसाहतींनी नाशिकला जगाच्या नकाशात स्थान मिळवून दिले, तसेच नाशिककरांची रोजी रोटी निर्माण केली.
                मानवाच्या यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली ही त्याच्या व्यक्तिमत्त्वात असते. तशीच गावाच्या विकासाची गुरुकिल्ली ही त्या गावाला मिळालेल्या भौगोलिक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वात दडलेली असते.
                  प्रत्येक गावाला नाशिकप्रमाणे भौगोलिक,सांस्कृतिक  तसेच ऐतिहासिक वारसा मिळालेला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात हा अमूल्य ठेवा जपला गेला तर, ती गावे नुसती तांत्रिक न होता, रुबाबदार नगरी (Smart City)म्हणून जगाच्या नकाशात स्वतःचे स्थान मिळवतील.

॥जय गुरुदेवदत्त॥