३ कीर्ती कठीयाचा दृष्टान्त
|
म्हाइंभट (तेरावे शतक) : मराठीतील पहिले चरित्रकार महानुभाव पंथाचे प्रवर्तक. महात्मा चक्रधरांचे निष्ठावान अनुयायी. चक्रधरांच्या उत्तरापंथ प्रयाणानंतर नागदेवाचार्यांच्या सहकार्याने अनुयायांकडून चक्रधरांच्या आठवणींचे परिश्रमपूर्वक संकलन करून ‘लीळाचरित्र’ हा मराठीतील पहिला चरित्रग्रंथ लिहिला. नंतर ‘गोविंदप्रभूचरित्र’ही लिहिले. महानुभाव पंथाचे तत्वज्ञान, तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक परिस्थिती, भाषा व समाजजीवन यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने ‘लीळाचरित्र’ हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे.
कोणताही जीव विकारापासून वेगळा राहत नाही, हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत लीळेत चक्रधर स्वामींनी ‘कीर्ती कठीयाचा दृष्टान्त’ सांगितलेला आहे. कोणत्याही कार्याचा आणि व्रतस्थपणाचा अहंकार बाळगणे हा सुद्धा विकारच आहे हे, प्रस्तुत लीळेतून पटवून दिले आहे.
---------------------------------------------------------------------------------
डोमग्रामी गोसावीयांचा ठायी उद्याचे मातीकाम होत होतेः ते सी बाजत होतेः
तेणे भक्तीजनासी व्यापार होववे नाः आन भट व्यापार करु लागले नाथोबाय म्हणीतलें: नागदेयाः तू कैसा काही
हिंवसी ना तवं भटी म्हणीतलें: आम्ही वैरागीः काइसीया हिवुः यावर सर्वज्ञे म्हणीतलें: वानरेयाः पोरा जीवासी वैराग्य मिरवु आवडेः हाही एकू विकारुचि कीं गाः यावरि
भटी म्हणीतलें: जी जीः निर्विकार तो कवणः सर्वज्ञें म्हणीतलें
वानरेयाः पोर जीव वीकारावेगळा केव्हळाही जालाचि नाहीः मा तु काई वेगळा अससिः हो कां
जीः यावरि गोसावी कीर्ती कठीयाचा दृष्टान्त निरोपिलाः कव्हणी एकू कठीया असे भोगस्थानाची
सुश्रुषा करीः झाडीः सडा संमार्जन करीः ते देखौनि गावीचे म्हणतिः कठीये नीके करीत असा
बरवे करीत असाः ते आईकौनि दीसवडीचा दीसवडी हात हात चढवीः तयासि देवता आपुले फळ नेदीः
तयासि कीर्तीचेचि फळ झालेः
लीळाचरित्र उत्तरार्ध : एकांक लीळा क्र. १२०
संपादक – प्रा. पुरुषोत्तम
नागपुरे
शब्दार्थ :-
ग्राम =गाव
|
ठायी = समोर
|
उद्या = सकाळी
|
ते= तेव्हा
|
सी = थंडी
|
तेणे =त्यामुळे
|
व्यापार = काम
|
आन = आणि / परंतु
|
वैरागी = तपश्चर्या करणारे
|
काइसीया = कशाला
|
वानरेया = माकडा
|
सर्वज्ञ = स्वामी
|
गा = अहो
|
कव्हणी= कोणी
|
सुश्रुषा = सेवा
|
कठीया = मंदिराचा पुजारी
|
निका= चांगला
|
बरवा = सुंदर
|
भोगस्थान =दैवतस्थान
|
दीसवडीचा दीसवडी= रोजच्या रोज
|
|
हात हात चढवीः = काम वाढवू लागला
|
नेदणे = न देणे
|
भाषांतर :-
डोमगावी स्वामींच्या समोर सकाळच्या वेळी मातीकाम (बागकाम
वगैरे) होत होते. तेव्हा थंडी वाजत होती,
त्यामुळे भक्तजनांना काम करता येत नव्हते. परंतु
भट (नागदेवाचार्य) काम करत होते.
नागोबाए (भक्ताचे नाव),” नागदेवा, तुला थंडी कशी वाजत नाही ? (तुला थंडी वाजत नाही का?) तेव्हा नागदेवाचार्य म्हणाले,
“आम्ही तपश्चर्या करणारे, आम्हाला थंडी कशी वाजेल?”
यावर स्वामी म्हणाले,
“भटो, वानरेया (कौतुकाने
माकडा) स्वतंत्र जीवाला वैराग्य मिरवायला आवडते. अहो, हा सुद्धा एक विकारच आहे.” यावर भट नागदेवाचार्य म्हणाले, “जी जी (स्वामी स्वामी) असा कोण आहे ? ज्याला
विकारच नाही.” स्वामी म्हणाले, “भटा,
वानरेया (कौतुकाने माकडा) स्वतंत्र जीव हा विकारापासून वेगळा नाही मग तू काय वेगळा आहेस ? “
“हो का?” असे भट म्हणाले. यावर स्वामींनी प्रसिद्धी हवी असणाऱ्या मंदिराच्या पुजाऱ्याचा दृष्टान्त सांगितला.
कोणी (कोणी एके काळी) एक पुजारी होता.
तो दैवतस्थानाची (देवतेची) सेवा करी, झाडी (मंदिर झाडायचा),
सडा रांगोळी करायचा. ते बघून गावातले म्हणायचे,
“पुजारी चांगले काम करीत आहे. सुंदर करीत आहे.”
हे ऐकून रोजच्या रोज तो पुजारी काम वाढवू लागला. त्याला (पुजाऱ्याला) देवता आपुले
फळ देत नाही. कीर्ती हेच त्याचे फळ झाले.
{ तात्पर्य :- लोकांनी
वाहवा केल्यामुळे, मंदिराच्या पुजाऱ्याने आपले काम वाढविले.
पूजा करण्यामागचा मुख्य हेतू (मोक्ष मिळविण्याचा)बाजूला राहिला. लोकांनी केलेली वाहवा वाढत गेली म्हणजे
पुजाऱ्याला फक्त कीर्ती - प्रसिद्धी मिळत गेली.}
स्वाध्याय : -
प्रश्न १ कोणांस उद्देशून म्हटले आहे ते लिहा
१ वानरेया - नागदेवाचार्य
२ सर्वज्ञ - स्वामी
३ गोसावी - स्वामी
प्रश्न २ आकृती पूर्ण करा
स्तुतीप्रिय
|
कठीयाची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्ये
|
मोक्ष मार्गाचे (ज्ञानमार्गाचे)
|
प्रश्न ३ : प्रस्तुत दृष्टान्तातील उपदेश तुमच्या शब्दांत सांगा
प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कोणतेही काम करु नये.
प्रश्न ४ : पुढील शब्दांना प्रमाणभाषेतील शब्द
सांगा
कठीया = पुजारी
सी = थंडी
काइसीया = कशाला
कव्हणी = कोणी
इयत्ता ९वीच्या पाठ्य
पुस्तकातील धड्याचे भाषांतर, महानुभावपंथीय गुरु आदरणीय डोळसकर
बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री. अमोल
गेटे (मराठी साहित्याचे गाढे अभ्यासाक) ह्यांनी करुन दिले. श्री. डोळसकर
बाबांना दंडवत तसेच श्री. अमोल गुटेसाहेबांना मनःपूर्वक धन्यवाद.
तेराव्या शतकातील
चक्रधर स्वामींचे लीळा चरित्र हा मराठी भाषेतील आद्य चरित्र ग्रंथ. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, श्रीगुरुचरित्र, तुकाराम
गाथा, दासबोध अशा अनेक प्राचीन ग्रंथातील ग्रंथभांडार शालेय शिक्षणात
समाविष्ट करताना, कठीण शब्दांचे शब्दार्थ धड्याखाली दिल्यास,
शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना समजणे सोपे होईल.
मराठी साहित्याच्या
ग्रंथ भांडार तसेच इतिहासातील शिवशाही त्याच्या मूळ अर्थासकट- उद्देशांसकट नवीन पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. शिवशाहीचे स्वप्न साकारण्याकरिता, सांगावेसे (भुक्कड*६)वाटते,
शिकण्या येतील लेक बालके
तीच लेकरे जाण सखे
जरीपटक्याचे दिवस आणण्या जगी
तयाची आण मायबोलीच्या मुखे
समाप्त
अनुप्रभा, नाशिक
संदर्भ:-
कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या ‘कांचनसंध्या’ कवितेतील शेवटचे (६वे) कडवे
शिणुनी
येती गुरें-पाखरें
तीच लेकरें जाण सखे,
दिवस जरेचे आले जरी
त्या काठ जरीचा लावू सुखें...!
तीच लेकरें जाण सखे,
दिवस जरेचे आले जरी
त्या काठ जरीचा लावू सुखें...!
* भुक्कड = निरुद्योगी बुभुक्षित (भुकेला हपापलेला गरजू )
|
॥ जय श्री गुरुदेवदत्त॥