घंटानाद देई स्मृतीस उजाळा
खुणावते मनी मज मम शाळा
सक्षमतेचे गिरविले इथे धडे
शाळा आमुची आम्हा आवडे
शालेय शिक्षणाने
मिळालेली सक्षमता कुठे तरी कमी पडत आहे का? गंगा सफाईसाठी भारतीय
पंतप्रधानांना इस्त्रायलसारख्या वाळवंटातील चिमुकल्या देशाची मदत घ्यावी लागत आहे.
गंगा, गोदा, ब्रह्मपुत्र,
सिंधू, यमुना, कावेरी,
कृष्णा अशा महान नद्यांनी सुजलाम असलेल्या देशात स्वतःचे तंत्रज्ञ शास्त्रज्ञ
हे स्वच्छता अभियान पेलू शकत नाहीत का? समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून
पिण्यायोग्य गोड पाणी बनविण्याचे इस्त्रायलयचे संशोधन अभिनंदनीय असले तरी व्यावाहारिक
आहे का? भारतीय उपखंडावर मान्सून पावसाचा जन्म भारतीय उपखंडाला
वेढणाऱ्या अरबी समुद्र, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर ह्या त्रिसमुद्रांनी होतो तर हिमालय पर्वत परतीच्या मान्सून
पावसाची कृपा करतो.
समुद्राचे पाणी
पिण्यासाठी वापरणे किंवा समुद्रात शिव स्मारक बनविणे म्हणजे आपणच ह्या सुजलाम् सुफलाम्
देशाचे वाळवंटात रुपांतर करणे होईल का ? तसेच
समुद्रातील मत्स्य मगर वगैरे जलसृष्टीने व त्यावर जीवन जगणाऱ्या कोळीबांधवांनी कुठे
जायचे?
इस्त्रायलने
वाळवंटात नंदनवन निर्माण केले तर आपल्या देशाची वाळवंटाकडे नेणारी घोडदौड का होत आहे ?
२१व्या
शतकातील इंग्रजाळलेल्या शिक्षणातून झालेली देशाची दुरावस्था पाहिल्यावर, २०व्या शतकातील मराठी भाषिक शाळांची उणीव प्रकर्षाने जाणवते. बालपणीच्या शाळेची घंटा आजही मनाला साद घालते.
घंटेला सांगावेसे वाटते,
घण घण घंटा वाजली आणि घटें, मला तुझ्या आगमनाची चाहूल लागली. तुझे आगमन किती सुखद वाटते सांगू !
तुझा मधूर आवाज आसंमतात घुमतो. ‘परमेश्वर हा नादब्रह्मात असतो’, असे म्हणतात. तो दृश्य स्वरुपात दिसत नाही पण तुझ्या आवाजात त्याचे अस्तित्व जाणवते. घंटे, तुझे मानवी जीवनात स्थान जाणवते. कोणत्याही पूजेची तयारी तुझ्याशिवाय पूर्ण होत नाही. पूजा संपल्यावर, तुझ्या तालावर आरती म्हटली जाते. देवाची भक्ती संगितातून व्यक्त होते. आरती तालासुरात म्हणण्यास इतर वाद्यांची साथ आवश्यक असते, पण तू नसलीस तर त्या आरतीत ताल - सूर हरवल्यासारखा वाटतो. घरातील देवघरात घंटी, तुझे आस्तित्व प्रामुख्याने आढळते .
स्थल
- काल परिस्थितीनुसार तुझ्या आकारात बदल झालेले असतील. लहान घंटा, मध्यम घंटा, मोठी घंटा, स्टीलची घंटा, तांब्या-पितळेची घंटा, चांदीची घंटा, सोन्याची घंटा असे बदल आढळतील. पण मूळ गाभा असतो, तुझा कर्णमधूर आवाज.
कोणत्याही देवळात मूर्तीची पूजा सकाळ -संध्याकाळ होत असते व शेवटी आरती व प्रसाद असतो. आरतीची घंटा ऐकल्यावर, भाविकांना धन्य वाटते. मनात म्हणतात, “चला, देवाची आरती तरी मिळाली”, ही एक श्रद्धाभावना असते. जीवनात श्रद्धा असणे फार महत्वाचे असते.
घंटे, गौरी आणि गणपतीचे आगमन व विसर्जन तुझ्याशिवाय होऊच शकत नाही. गौरी गणपतीचे आगमन तुझ्या सहवासात मोठे आनंदाने होते. विसर्जनाच्यावेळी तू घण - घण आवाज करत त्यांच्याबरोबर जातेस. त्या आवाजात निरोपाची भावना असते तसेच
पुढल्या वर्षी लवकर येण्याचे आश्वासन असते. तू भक्तांच्या भावना जाणून घेतेस.
इतिहासात तुला किती मानाचे स्थान आहे म्हणून सांगू! तू पराक्रमाचे प्रतिक आहेस. तुला तर माहिती आहे, चिमाजीप्पा या शूर वीराने वसईच्या लढ्यातून तुला सुरक्षित आणून, नाशिकला नारोशंकराच्या मंदिरात ऊंच जागी बसवली आहे. तू शौर्याचे प्रतिक आहेस, ऊंचावर बसून तू समाजाला क्षात्रतेजाचे महत्व सांगत तू अहोरात्र उभी आहेस. स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर क्षात्रतेज प्रज्वलित झाले पाहिजे. हा महान संदेश तू अखंड देत आहेस. देश सबल व्हावयास पाहिजे. दुर्बलांच्या शब्दाना काहीही किंमत नसते. हेच तुझ्या जीवनाचे ध्येय आहे. तू बोलत नाहीस पण आवाजातून जीवनाचा मंत्र देत आहेस.
घंटे, तुझी महती किती सांगू ! तू जगाला जागृतीची जाणीव करून देतेस. तू जणू म्हणते आहेस, “डोळे उघडून पहा, सांगायचे काय काय ?” तू देवळात जाऊन बसलीस पण तुझा सर्वत्र संचार मला दिसतो. तू शैक्षणिक क्षेत्रातही प्रवेश केलास. घंटा वाजली की मनाला ह्या ठिकाणी जवळपास मंदिर किंवा चर्च आहे, ह्याची जाणीव होते. आपोआप भाविकांची पाऊले त्या बाजूला वळतात. तसेच घंटा वाजली की, शाळेची जाणीव होते. अर्थात ह्या दोन घंटामध्ये बारीक फरक जाणवतो, शेवटी तीच तू असते.
शाळा सुरू होताना, घंटा वाजते. पाटी दप्तर घेतलेली बालके, आनंदाने शाळेत प्रवेश करतात. उत्साही वातावरण असते. प्रार्थना निरनिराळे विषय- मराठी, इंग्लिश, हिंदी, संस्कृत, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सायन्स जीवनावश्यक विषय इतकेच काय कलाविषय जे मानवी जीवनाला समृद्ध करतात. संगित, चित्रकला,
पाककला वगैरे व शेवटी खेळाचा तास जो सर्वांचा आवडता विषय.ह्या सर्वाची सुरुवात घंटे तुझ्या आवाजाने होते व समाप्तीही तुझ्या निरोपाच्या घंटेने होते. पाटी दप्तर घेतलेली मुले, आनंदात घराकडे धूम पळतात. तुझे एकंदर अस्तित्वच चैतन्यपूर्ण असते.
काळाप्रमाणे तुझे रुप बदलले. तू दुचाकीवर- सायकलवर जाऊन बसलीस. सायकलची घंटी वाजली की, तुला रस्त्यावर सायकल चालवावयास अडथळा होत नाही. देशाच्या स्वच्छता अभियानात तू प्रवेश केलास. गावाची स्वच्छता करण्यासाठी कचरापटी गोळा करण्यासाठी तू घंटागाडीत जाऊन बसलीस पण काहीवेळा तू गैरहजर का रहातेस ? मला कारण काही समजत नाही ?
हळू हळू तुझे स्थलांतर निरनिराळ्या ठिकाणी दिसू लागले. तू स्कूटर, मोटारसायकल, रिक्षा तसेच कारमध्ये जाऊन बसलीस. वेगवान जगात तू मागे राहिली नाहीस. तुझे नाव तेवढे बदलले. लोक तुला हॉर्न म्हणू लागले. तू जमिनीवरच काय तुला पाण्यातही जीवनकार्य करावयाचे होते. तू जहाजावर ‘भोंगा’ ह्या स्वरुपात बसलीस.
बदलत्या काळाप्रमाणे तू विद्युत उपकरणात प्रवेश केलास. घड्याळात
‘गजर’ हे नाव धारण केलेस. जीवनात धड्याळ फार आवश्यक आहे. दिवसाची सुरुवात घड्याळ व त्याचा गजर ह्यांच्या
तालावर होते.
घंटे, तुझे जीवनकार्य किती मोठे आहे म्हणून सांगू ! पण तुला त्याची जाणीव आहे का नाही मला माहित नाही. तुझी महती वर्णन करण्यास माझ्याजवळ शब्द अपूरे पडतात.
जीवाचे जीवनकार्य संपल्यावर त्या जीवाला निरोप देण्याची वेळ आल्यावर, मृत्यूची घंटा वाजते, असे म्हणतात. जीवन हे क्षणभंगूर आहे, जीवनात सत्कर्म करा, वगैरे तत्वज्ञान भारतीय संस्कृती सांगते.
ही मृत्यूची घंटा केव्हा वाजते? त्याची जाणीव त्या जीवाला नसते. त्यावेळी तू फारच अदृश्य स्वरुपात असतेस, कोणालाच दिसत नाहीस. तुला निश्चित माहित असते. आत्मा अमर आहे. ‘पुनरपि जननं पुनरपि मरणम्’ त्यामुळे तुझे कार्य अमर आहे.
प्रसिद्ध भौतिक
शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग्ज ह्यांनी प्रदुषणामुळे मानव जात नष्ट होण्याचा इशारा दिलेला
आहे. जलतज्ज्ञ श्री.राजेंद्रसिंहजींनी गोदावरीस
सिमेंटच्या विळख्यापासून वाचवा, अन्यथा गोदा प्रलयाची शक्यता
वर्तवलेली आहे. ह्या सर्व धोक्याच्या घंटाचा नाद समजण्यासाठी,
ह्या मातीतल्या मायबोलीतून शिक्षणाची
गरज सांगताना म्हणावेसे वाटते,
‘ हे कर्मयोगिनी
घंटे, परत एकदा आपल्या माय मराठी शाळांमधून तुझा आवाज दिमाखात
ऐकू येऊ दे. मायबोलीच्या तीर्थक्षेत्री घडणारी गणित –
शास्त्र - इंग्रजी ह्या विषयांची त्रिस्थळ यात्रा
(भुक्कड ५) *
हीच आपुली तीर्थत्रिस्थळी
वाहील आपुल्या जळी-मूळी
असू दे तिथे घंटेचा हिंदोला
मिळविण्या महासत्तेच्या माला
अनुप्रभा, नाशिक
॥ जय श्री गुरुदेवदत्त ॥
* संदर्भ:-
कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या ‘कांचनसंध्या’ कवितेतील पाचवे कडवे
इथेच
अपुली तीर्थत्रिस्थळी
वाहे अपुल्या मुळी तळी
असू तिथे सखिओला वट मी
आणिक तू तर देव तळी
* भुक्कड = निरुद्योगी, बुभुक्षित (भुकेला हपापलेला गरजू )
हिंदोल = गायनातील एक राग
|
No comments:
Post a Comment