‘श्रीगुरु श्रीपाद
वल्लभ’ हे ‘विश्वात्मक’ परमात्मा कुरवपुर या क्षेत्री अदृश्य रुपात असून त्यांचे अनेक
अवतार झाले, हा सिद्धांत अध्याय १० मध्ये श्रीगुरुचरित्रकार मांडतात.(ओवी क्रमांक ३,
४)
हा सिद्धांत नामधारक
शिष्याप्रमाणे आपल्यासारख्या वाचकांच्या मनात प्रश्नांचे मोहोळ उठवितो. ह्या प्रश्नाचे
उत्तर देताना श्रीगुरुचरित्रकार सांगतात,“मी भगवान परशुराम पाहिला”
असे एखादा माणूस उद्या सांगेल. तो त्याचे
म्हणणे ‘खरे आहे’ ह्या मतावर अजूनही
स्थिर ठाम असेल.”
(ओवी क्रमांक ५)
मीमांसा :-
चिरंजीव = चिर(दीर्घकालिक) + जीव (जगणारा) = दीर्घायुषी.
इतिहासामध्ये अश्वत्थामा,
बली , व्यास, हनुमंत, बिभीषण, कृप व परशुराम ह्या व्यक्ती चिरंजीव म्हणजे दीर्घायुषी
होत्या.
ह्यापैकी हनुमंत, परशुराम
व अश्वत्थामा ह्या तीन व्यक्ती चिरंजीव म्हणजे अजूनही जिवंत आहेत, असा प्रचलित समज
आहे.
हनुमंत:- नासिक जवळील
अंजनेरी पर्वतावर, मारुती जन्माला आल्याबरोबर, सूर्यबिंबास फळ समजून, सूर्याकडे झेपावला.
तेव्हा इंद्राने ह्याच्या अंगावर वज्र टाकले, तेव्हा मारुतीची हनुवटी भग्न झाली. म्हणून
मारुतीरायास हनुमंत हे नाव पडले.
असा हा हनुमंत त्याच्या बलोपासनेच्या संदेशाने तसेच श्रीरामभक्तीने अजरामर झाला.
परशुराम विष्णुचा अवतार
असलेला परशुराम भृगुवंशीय जमदग्नि ऋषींचा पुत्र होय. भृगुवंशातला राम म्हणून परशुरामास
‘भार्गवराम’ असेही म्हणतात. जमदग्नी ऋषींची गाय कार्तवीर्याने नेल्यामुळे, परशुरामाने
कार्तवीर्यास मारले. ह्या घटनेनंतर कार्तवीर्याच्या
मुलांनी जमदग्नी ऋषींचा वध केला. परशुरामाने आपल्या वडिलांच्या खुनाचा सूड घेण्यासाठी
प्रतिज्ञा करुन पृथ्वी २१वेळा निःक्षत्रिय केली. परशुरामाने
प्रभुरामचंद्रांना युद्धाचे आवाहन दिले. या युद्धात पराभूत झालेल्या परशुरामास प्रभू
रामचंद्रांनी जिवंत सोडले. त्यामुळे खजिल झालेला परशुराम श्रीगुरुदेव दत्तात्रेयांचा
शिष्य झाला. क्षत्रिय राजांकडून युद्धात जिंकलेले राज्य परशुरामाने कश्यप ऋषींना
दान दिले व आपण स्वतः पृथ्वीच्या भूगर्भीय घडामोडीने अरबी समुद्र किनाऱ्यावर निर्माण
झालेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगावर देश वसविण्यासाठी गेला. कोकणचा ‘आद्य पुरुष भगवान परशुराम’ होय.
विद्या व शस्त्र यांच्या संगमातून जग जिंकणाऱ्या परशुरामाची नोंद इतिहासात अजरामर झाली.
अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा
पुत्र असून उत्तम धनुर्वेत्ता होता. महाभारतकालीन युद्धात पांडवांचा जय झाल्यावर,
अश्वत्थामाने रात्रीच्या
वेळी पांडव निद्रिस्त असताना, पांडवांचे पुत्र तसेच धृष्टधुम्न इत्यादि अनेक वीर
ठार मारले. अर्जुनाशी अश्वत्थामाचे युद्ध झाले. ह्या युद्धात पराभूत झालेल्या अश्वत्थामाने,
पांडवांच्या नाशार्थ सोडलेले ब्रह्मास्त्र, अभिमन्युपत्नी- उत्तरेच्या गर्भात शिरले.
श्रीकृष्णाने ह्या ब्रह्मास्त्राचा नाश करुन गर्भाचे रक्षण केले.
स्वतःचा झालेला पराभव मान्य
करता न आलेला अश्वत्थामा, प्रतिशोधातून
आलेल्या अस्वस्थतेमुळे, दीर्घायुषी होऊनही, ऐतिहासिक व्यक्ती म्हणून स्वतःचे स्थान निर्माण करु शकला नाही.
|
“चिरंजीव परशुराम म्हणजे अजूनही जिवंत असलेला परशुराम दिसला, हा सिद्धांत ज्याप्रमाणे
आपण मान्य करतो, त्याचप्रमाणे श्रीपाद वल्लभ कुरवपुरात आहेत, हा सिद्धांत मान्य करावा”
असे श्रीगुरुचरित्रकार म्हणतात.
हा सिद्धांत समजावून सांगण्यासाठी
श्रीपाद वल्लभांच्या जलसमाधीतून झालेल्या अवतार समाप्तीनंतर प्रसिद्ध झालेली आख्यायनी
(दंतकथा) श्रीगुरुचरित्रकार सांगतात.
या दंतकथेतील ‘वल्लभेश’ नावाचा
ब्राह्मण व्यापार करण्याचा उद्योग करीत असल्याने, श्रीगुरुचरित्रकार त्याला ब्राह्मण
न म्हणता ‘व्यापारी म्हणतात’ (ओवी क्रमांक १५) ह्यावरुन ६५०वर्षांपूर्वी मनुष्याची जात ही जन्मावर आधारीत नव्हती तर त्याच्या
कर्मांवर ठरत असावी, असे दिसते.
‘वल्लभेश’ हा श्रीपाद वल्लभभक्त दरवर्षी
कुरवपुर यात्रेस जात असे. एकदा व्यापारास
निघण्याआधी त्याने नवस केला की
‘व्यापारात फायदा झाला तर कुरवपुर क्षेत्री ब्राह्मणांना इच्छा भोजन घालून तृप्त करीन.’
व्यापार यशस्वी झाल्यावर, व्यापारी द्रव्य
बरोबर घेऊन कुरवपुर यात्रेस निघालेला चोरांनी पाहिला. यात्रेकरुच्या रुपात चोरही व्यापाऱ्याबरोबर
निघाले. कुरवपुरास जंगलमार्गे जात असताना, रात्र झाली. चोरांनी व्यापाऱ्यास मारुन त्याच्याकडचे
द्रव्य लुबाडले.
हातात खड्ग, त्रिशूळ घेतलेली.
जटाधारी व्यक्ती अचानक घटनास्थळी आली. जटाधाऱ्याने चोरांना
मारुन टाकले. एका चोराने ह्या त्रिशूळधाऱ्याच्या विनविण्या करुन आपले स्वतःचे प्राण वाचविले. ह्या जटाधाऱ्याने ह्या चोराच्या
हातात भस्म देऊन ते व्यापाऱ्यावर शिंपडण्यास सांगितले. (ओवी क्रमांक २८)
ब्राह्मण जिवंत झाला. सूर्योदय झाला,
जटाधारी अदृश्य झाला. जिवंत राहिलेला चोर ब्राह्मणास गोष्ट रंगवून सांगू लागला. वास्तविक जटाधाऱ्याच्या हाता पाया
पडल्याने, चोरास जीवदान मिळालेले असते, परंतु चोर घडलेली घटना लबाडीने सांगतो,
“तुझ्या निमित्याने
मला राखले,अतिशय प्रेमाने धरुन बसविले. भस्म मंत्रून तुला लावून तुझा देह
सजीव केला.” (ओवी क्रमांक ३३)
चोराच्या मते, ब्राह्मण शंकराचा भक्त असल्याने, त्रिपुरारीच ब्राह्मण व्यापाऱ्याच्या
मदतीला धावून आलेला असावा.
त्रिपुरारि= त्रिपुर + अरि (शत्रू)= श्रीशंकर
|
त्रिपुर= तारकासुराच्या
तीन मुलांनी, ब्रह्मदेवाकडून सोने, रुपें आणि लोखंड यांची आकाश, अंतरिक्ष व पृथ्वी
यांवरील अभेद्य फिरती शहरे मागून घेतली.
ह्या तीनही शहरांना मिळून त्रिपुर म्हणत. ती शहरे श्रीशंकराने जाळली.
|
जटाधाऱ्याच्या
रुपात ईश्वर आपल्या मदतीला आला, ह्यावर व्यापाऱ्याचा विश्वास बसला. त्याने
चोराकडून आपले द्रव्य परत घेतले . कुरवपुरास
जाऊन ‘वल्लभेशने’ श्रद्धेने आपला नवस पूर्ण केला .
“श्रीगुरु
श्रीपाद वल्लभ कुरवपूर क्षेत्री आहेत.” ही
श्रीगुरुचरित्रकारांची श्रद्धा या गोष्टीतून दिसून येते.
भौतिक जगात
अवतार घेण्यासाठी श्रीपाद वल्लभ रुपी विश्वात्मक परमात्म्याची उर्जा कुरवपूर ह्या तीर्थ
क्षेत्री अस्तित्वात आहे, ह्या श्रद्धेतून श्रीगुरुचरित्रकार म्हणतात श्रीगुरुचरित्रकार म्हणतात,
अनंतरुप नारायण। परिपूर्ण असे सर्वां ठायीं॥१०-४०॥
श्रीमद् भगवद् गीतेतील
परमात्मा ह्या शब्दाची व्याख्या पुढीलप्रमाणे
द्वौ इमौ पुरुषौ
लोके क्षरः च
अक्षरः एव च ।
क्षरः सर्वाणि भूतानि
कूटस्थः अक्षरः उच्यते ॥ १५ - १६ ॥
अर्थ:-
या संसारात नाशवंत
आणि अविनाशी असे
दोन प्रकारचे पुरुष
आहेत. त्यामध्ये सर्व
प्राणिमात्रांची शरीरे नाशवंत
( क्षर - पुरुष ) आणि जीवात्मा
अविनाशी (अक्षर
- पुरुष ) म्हटला जातो.
उत्तमः पुरुषः तु
अन्यः परमात्मा इति
उदाहृतः ।
यः लोकत्रयम्
आविश्य बिभर्ति अव्ययः
ईश्वरः ॥ १५ - १७॥
अर्थ:-
परंतु या दोन्ही
पुरुषांपेक्षा उत्तम पुरुष
तर आगळाच आहे . त्यालाच परमात्मा
म्हटले जाते . तोच अविनाशी
परमेश्वर असून , तो तीन्ही
लोकांत प्रवेश करुन
सर्वांचे धारण - पोषण करतो .
यस्मात्
क्षरम् अतीतः अहम्
अक्षरात् अपि च
उत्तमः ।
अतः अस्मि लोके
वेदे च प्रथितः
पुरुष उत्तमः ॥१५ - १८॥
अर्थ:-
मी परमात्मा, क्षर पुरुषाच्या
अतीत आणि अक्षर
पुरुषापेक्षा उत्तम असल्यामुळे
या लोकांत आणि
वेदांत “ पुरुषोत्तम
” या नावाने
प्रसिद्ध आहे .
थोडक्यात क्षर आणि अक्षर यांच्या पलीकडे जो आहे त्याला परमात्मा म्हणतात, असे आपल्याला म्हणता येईल
क्षर
म्हणजे नाशवंत होणाऱ्या सर्व गोष्टींना आपण भौतिक
शास्त्राच्या सहायाने अभ्यासू शकतो यालट अक्षर म्हणजे कधीही नष्ट न
होणाऱ्या गोष्टी म्हणजे उर्जा शक्ती.
ही उर्जा
शक्ती श्रीभगवद् गीतेनुसार
यावत् सञ्जायते किंचित्
सत्त्वम् स्थावरजङ्गमम् ।
क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात्
तत् विद्धि भरतर्षभ ॥ १३ – २७ ॥
अर्थ:-
हे भरतश्रेष्ठ अर्जुना ! जेवढे काही निर्जीव ( अचर ) आणि सजीव ( चर )प्राणिमात्र उत्पन्न होतात;ते सर्व क्षेत्र (matter) वक्षेत्रज्ञ (energy) यांच्या संयोगाने उत्पन्न होतात , हे तू जाण .
सुमारे ५०००
वर्षांपूर्वी श्रीमद् भगवद् गीतेत वर्णन केलेल्या उर्जा शक्तीचा अभ्यास, भौतिक शास्त्रात
इसवी सन १६७० मध्ये जर्मन गणितज्ञ श्री गॉटफ्रा इड लेबनिझ (Gottfreid Leibniz) ह्यांच्या
‘लिव्हिंग फोर्स (Living force)’ ह्या सिद्धांताने सुरु झालेला आढळतो.
इसवी १८४१मध्ये मेयर ह्या शास्त्रज्ञानी प्रथम केलेली
उर्जेची व्याख्या
Energy can be neither created nor destroyed
अर्थ:-
उर्जा
उत्पन्न किंवा नष्ट करता येणे शक्य नाही.
इसवी सन
१८४९ मध्ये आयरिश भौतिक शास्त्रज्ञ थॉमस विल्यमस् यांनी उर्जेचे वर्णन करताना म्हटले
आहे
Nothing can be lost in nature --- no energy can
be destroyed
अर्थ:-
निसर्गात कोणतीच गोष्ट नष्ट होणे शक्य नाही.------- उर्जा नष्ट करता येणे शक्य
नाही.
Fundamental,irreducible primordial
energy exists in the absence of matter,
but matter is entirely dependent upon nonmaterial primordial energy
and cannot exist in the absence of primordial
energy.
अर्थ:-
भौतिक
गोष्टी अस्तित्वात नसतानाही, मूलभूत संक्षिप्त न करण्यासारखी, आदिम उर्जा अस्तित्वात
आहे परंतु भौतिक गोष्टींचे अस्तित्व पूर्णतः
ह्या अभौतिक आदिम उर्जेवर अवलंबून असते तसेच
ह्या आदिम उर्जेच्या अस्तित्वाविना भौतिक गोष्टी
अस्तित्वात येणे शक्य नाही.
आजच्या आधुनिक विज्ञानयुगाचे ‘पितामह’ असलेले
थोर तत्वज्ञ तसेच भौतिक शास्त्रज्ञ श्री अल्बर्ट आइनस्टाइन हे श्रीमद् भगवद् गीता नियमित
वाचत असत. श्रीमद् भगवद् गीतेविषयी आपले मत नोंदविताना श्री आइनस्टान म्हणतात,
“When
I read the Bhagwad-gita and reflect about how God created this universe
everything else seems so superfluous”
अर्थ:-
“मी जेव्हा
भगवद् गीता वाचली आणि (भगवद् गीतेत सांगितलेल्या)
परमात्म्याने कशी विश्व निर्मिती केली? (ह्या विचारांवर) मी खोलवर जाऊन विचार
केला, तेव्हा मला इतर (सर्व विश्वनिर्मितीविषयक गोष्टी) अवाजवी असल्याचे दिसून आले.”
‘The World as I See it’ ह्या स्वलिखित पुस्तकात आइनस्टाइन म्हणतात,
‘I
maintain that the cosmic religious feeling is the strogest and noblest motive
for Scientific research.’
‘माझे
मत आहे की वैश्विक श्रद्धेवरील विश्वास हीच शास्त्रीय संशोधनामागची जबरदस्त आणि प्रामाणिक
प्रेरणा आहे.’
व्यावाहारिक जगातील लोकांना, आध्यात्मिक भक्तीमार्गाकडे
नेताना, श्रीगुरुचरित्रकारांची विश्वात्मक
परमात्मावरील दृढ श्रद्धा पाहून, माझे मन म्हणते,
विश्वात्मक
परमात्मा। जाणावया मी किमात्मा।
अपार महिमा तुम्ही सांगता। अनन्य श्रद्धेने
नमन करीतसे॥