सगुण मूर्ति : रुप (भाग
१)
चिंता नुरे हरतसे मनु देह ताप।
विद्येमुळे मिळतसे यश अमाप॥
भजा हो तुम्ही ‘विद्याधरदेव’ देवा।
याचीतसें तव पदीं दृढ ‘ज्ञान’ ठेवा॥
नुकतीच
दि. ३ फेब्रुवारी २०१४ रोजी (माघ शुद्ध
चतुर्थी) आपण ‘श्रीगणेश जयंती’ साजरी केली.आपल्या
लाडक्या गणपतिबाप्पाकडे आपण ज्ञानाचा ठेवा मागितला. श्रीगणेशाला ‘विद्याधर’ विद्येची
देवता म्हणतात. श्रीगणेशाची मूर्ति खरोखरच ज्ञानदेवतेची
वैशिष्ट्ये दर्शविते का? ते पाहू या.
श्रीगणपतीच्या पायाशी असलेला उंदीर :-
गणपति मूर्तिच्या पायाशी त्याचे वाहन छोटासा उंदीर
आहे. उंदीर हा
प्राणी छोटा असला तरी कुरतडून शेतीतील धान्याचा नाश करतो. थोडासा
अहंकार कुरडून तुमच्यातील ज्ञानाचा नाश करत असतो. ही गणपतिची मूर्ति सांगते, ‘ज्ञान मिळविताना
प्रथम अहंकाररुपी उंदीरावर आरुढ व्हा म्हणजे मनातील अहंकारावर मात करा’.
जानवे : साप
ह्या मूर्तिचे जानवे साप आहे. साप उंदीराचा शत्रू - उंदीर
नष्ट करणारा असल्याने शेतकऱ्याचा मित्र. तुमच्यातील अहंकार दूर करणारे मित्र, ज्ञान साधनेत तुमच्या बरोबर असावेत म्हणजे ज्ञानरुपी शेतीचे रक्षण
होईल.
देह माणसाचा व मुख सर्वात बुद्धिमान प्राणी हत्तीचे :-
लंबोदर :-
ह्या मूर्तितील मनुष्यदेहाचे पोट मोठे आहे, म्हणून गणपतिचे एक नाव लंबोदर
= लंब+ उदर= मोठे पोट असलेला.
संत एकनाथमहाराजांनी ह्या मोठ्या पोटात सर्व चराचर सामाविलेले आहे,
असे म्हटले आहे. ह्याचा अर्थ हत्तीच्या
बुद्धीमत्तेने
तुम्हाला मिळालेले ज्ञानरुप अन्न ह्या चराचरापर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व समाजास उपयुक्त झाले पाहिजे.
त्रिशुल: -
ह्या मुर्तीच्या एका हातात त्रिशुल आहे म्हणजे ज्ञानाबरोबर तुम्ही सदैव शस्त्रसज्ज असायला हवे. आपण नेहमी म्हणतो,
' भारतीयता आणि विश्वबंधुता
तत्वे थोर उदार
पण दुर्बलांच्या शब्दांना मान कोण देणार ? '
पाश:-
दुसऱ्या हातात पाश आहे. हा पाश आपल्याला सांगतो आपल्या मनातील, समाजातील पाप ह्या पाशाने दूर करा.
मोदक:-
ह्या मूर्तिच्या पुढच्या
हातात मोदक आहे. मोद म्हणजे कल्याण, ज्ञानाने
धनधान्य पिकवून सर्व समाजाचे कल्याण करा.
दुसऱ्या हातावर ॐ हे अक्षर आहे:-
ॐ ह्या शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वरांनी सांगितला आहे, ॐ म्हणजे अ+ उ +म.
‘अकार तो ब्रह्म, उकार तो विष्णु,
मकार तो महेश जाणियेला.’
अध्याय ३-यांत श्रीगुरुचरित्रकार ह्याच
त्रिमुर्तिचे वर्णन करतात
ब्रह्मयाचा
रजोगुण। विष्णु असे सत्त्वगुण।
तमोगुण
उमारमण। मूर्ति एकचि अवधारा॥ ५२॥
ह्या सर्व
वर्णनातून श्रीगुरुचरित्रकार सांगताना दिसतात, ‘श्रीदत्तात्रेय ही एकच मूर्ति म्हणजे व्यक्ती आहे. जिच्यात तीन मूर्ति एकत्रित नसून तीन गुण एकत्रित आहेत. अशा ह्या त्रिगुणात्मक दत्तगुरुंमध्ये ब्रह्मदेवाचा रजोगुण, श्रीविष्णुचा सत्त्वगुण व श्रीशंकराचा
तमोगुण एकत्रित झालेला आहे.’
श्रीदत्ताची पिढ्यांपिढ्या चालत आलेली मुर्ति ब्रह्मा, विष्णु व महेश ह्यांची तीन मुखे व सहा हात असलेला मनुष्यदेह.
ह्यातील ब्रह्मदेव रजो गुण हा सृष्टी निर्माण करणारा, विष्णु सत्त्वगुण हा त्या सृष्टीचे पालन करणारा तर महेश तमो गुण म्हणजे तामसी
तापट हे तीनही गुण एकत्रित असलेली मूर्ति.
शंकर
ह्या शब्दाची व्याख्या आहे,
यः शमम् करोति इति शंकरः
शम् म्हणजे कल्याण जो पाप नाहिसे करुन सर्वांचे कल्याण करतो तो शंकर.
‘श्रीगुरुचरित्रा’त श्रीगुरुचरित्रकारांची समाजाला भक्तीमार्गाकडे वळविण्याची तळमळ दिसून येते.
श्रीगुरुचरित्रांत सांगितलेली परमेश्वराची भक्ति निश्चित कशी करायची?
संत
वाड़मयात आपण ईश्वरभक्तीची अनेक रुपे पहातो.
सावंता
माळी कांदा, मुळा पिकवण्यात विठ्ठलाची भक्ति केली असे
समजतो. कर्मयोगात तो देवाचे रुप जाणतो .
गोरा
कुंभार चिखल तुडवताना विठ्ठलाचे नामस्मरण करतो.
जनाबाई
दळण - कांडण करताना विठ्ठलाचे नाव घेऊन भक्ति करते.
आमचा
भक्तपुंडलिक म्हणतो,
"आई बाप हे दैवत, माझे| असता
माझ्या घरी, कशाला
जाऊ मी पंढरपूरी"
मातापित्यांच्या
सेवेत तो विठ्ठलाचे रुप पहातो यापुढे जाऊन तो प्रत्यक्ष देव भेटीस आले, असे समजून तो विठ्ठलाला म्हणतो ,
“विठ्ठला उभे रहा विट्टेवरी”
अलिकडच्या काळातील उदाहरण
माई मंगेशकरांच्या देवाविषयीच्या भावना शांताबाई शेळके यांनी सुरेख काव्यबद्ध
केलेल्या आहेत.
‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश,
माझ्यासाठी देव माझा पाहत आहे’
सावंता माळी,
भक्त पुंडलिक, जना बाई, माई मंगेशकर हे सर्व दैनंदिन जीवनात ईश्वरभक्ती
करणारे कर्मयोगी.
काही कर्मयोगी लोक त्यांच्या कामालाच देव मानतात.
श्रीगुरुचरित्र सांगते तुमच्या दैनंदिन जीवनातील कामे ईश्वरापर्यंत पोहोचतात.
सर्वसामान्य
माणसाला असा कर्मयोग आचरावा किंवा अशी मानसपूजा करावी म्हणून सांगितले तर आपल्याला
नक्की काय करायचे? हेच कळणार नाही. तसेच
परमेश्वर तर आपण पाहिलेला नाही, आपल्याला दिसत नाही.
ह्यासाठी आपल्या पूर्वजांनी परमेश्वराच्या मुर्ती निर्माण करुन समाजाला भक्तिमार्गाकडे
जाण्याचा राजमार्ग दाखवून दिलेला आहे.
आपण घरी, देवळात देवाची पूजा- अर्चा करतो. मन, घर, देऊळ मंगलमय, प्रसन्न अनुभवतो. कोणत्याही देवतेची पूजा -अर्चा करताना, त्या मूर्तीतून प्रतित होणारे गुण समजून
घेऊन आत्मसात करता आले तर खरोखरच त्या देवाची पूजा सफल झाली असे म्हणता येईल.
उदाहरणार्थ : श्रीदत्तात्रेयांची मूर्ति आपल्याला सांगते, प्रत्येक
माणसात हे तीनही गुण (रज, सत्त्व, तम) असणे आवश्यक आहेत.
उदाहरणार्थ : आपण शेतकरी घेतला तर
तो आपल्या शेतात शेती करुन त्याची सृष्टी निर्माण करतो - ब्रह्मदेवाचे काम
त्या शेतीला पाणी, खते घालून
ह्या सृष्टीचे संगोपन करतो - श्रीविष्णुचे काम
वेळच्या वेळी निंदणी, खुरपणी
करुन आलेले तण काढून टाकतो. पिकांवर पडलेली कीड
वेळीच औषधांच्या सहाय्याने नष्ट करतो (अर्थात येथे
केमिकल्स कमीतकमी वापरावीत). शेतीत आलेले पाप : कीड, तण दूर
करतो तमो गुणी - शंकराचे काम
अशाप्रकारे
आपल्या शेतीचे जर अद्ययावत ज्ञान ठेवले तर आपल्या कृषीप्रधान देशात सर्वत्र शिव म्हणजे
पावित्र्य नांदायला वेळ
लागणार नाही.
गृहिणी सुद्धा आपल्या घराच्या विश्वात
आपली छोटीशी सृष्टी निर्माण करत असते, हे झाले - ब्रह्मदेवाचे काम.
ह्या सृष्टीची अन्नपुर्णा त्या घरातील गृहिणी असते, तसेच सर्वांना काय हवे
नको ते पाहून त्या सृष्टीचे पालन करत असते हे झाले -श्रीविष्णुचे काम.
काही वेळेला रुद्रावतार घेऊन घरातील मुले किंवा कोणी सदस्य चुकीच्या
किंवा पापाच्या मार्गाने जात असेल तर त्यांना थांबवते- शंकराचे काम
ही दत्तमूर्ति सांगत असलेली वैशिष्ट्ये जरी आपण प्रामाणिकपणे आपल्या ज्ञानाचा
उपयोग करुन आपल्या संसारात वापरली तर घरात खरोखरच शिव म्हणजे पावित्र्य नांदू लागेल.
पूर्वजांनी दिलेला सगुण विविध मूर्तिंचा अमुल्य ठेवा आपल्याला संदेश देत
असतो
भाव तैसा मूर्तित देव दिसे ।
डोळस श्रद्धेत ज्ञान असे॥
क्रमशः
(संदर्भ ग्रंथ :
॥श्रीदत्तात्रेय ज्ञानकोश॥ लेखक डॉ. प्र. न. जोशी
प्रकाशक : श्रीदत्तात्रेय
ज्ञानकोश प्रकाशन, पुणे)