श्रीगुरुदेवदत्तांनी
आपला शिष्य भगवान परशुराम यांस ज्ञानी लोकांचे तीन प्रकार सांगितले आहेत : -
२) मध्यम
३) श्रेष्ठ
श्रीदत्तगुरुंनी
सांगितलेली ज्ञानी माणसाची लक्षणे आजही आपण
समाजात पहातो.
१) कनिष्ठ ज्ञानी :
खालच्या दर्जाचा
ज्ञानी माणूस हा त्याच्या स्वतःच्या देहाची काळजी घेत नाही. हे
लोक जेव्हा शांत असतात, तेव्हाच फक्त व्यवस्थित असतात.
हे लोक जेव्हा आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करीत नसतात, तेव्हा त्यांच्यातील पशुतुल्य भावना म्हणजे शारिरिक जाणीवा प्रखर असतात. एरवी त्यांच्यावर
ह्या पशुतुल्य भावनांच्या खूणा दिसत नाहीत, त्यामुळे ते बंधमुक्त
असतात.
जग ह्या कनिष्ठ
दर्जाच्या ज्ञानी लोकांच्या इतके आहारी
जाते की, त्यांच्या दोषांकडे
जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. श्रीदत्तगुरु सांगतात, ज्याप्रमाणे कापडाच्या
किनारीला नक्षीकामासाठी लावलेला रंग कापड धुतल्यावर कपड्यावर पसरतो, तशा ह्या लोकांच्या नैसर्गिक पशुतुल्य जाणीवा, त्यांच्या
वागणुकीत येतात. काही काळानंतर जग त्यांचे गुलाम राहू शकत नाही.
हल्लीचे समाजातील अंधश्रद्धा
पसरविणारे बाबा लोक हे
कनिष्ठ दर्जाचे ज्ञानी लोक म्हणायला पाहिजेत. कै. नरेन्द्र दाभोळकर व त्यांची अंधश्रद्धा निर्मूलन समिती, समाजाला ह्या लोकांच्या बळी पडू नका म्हणून झटत असते. परंतू पुण्य मिळविण्याच्या नादात आपला समाजच ह्या लोकांना मोठे करतो व नंतरचे त्या बाबा लोकांचे होणारे अधःपतन
व त्यात बळी जातो तो समाजच. आज सुद्धा बाबाला अटक, मुलगा पळून गेला, ह्या बापलेकांच्या अत्याचाराने पिडीत स्त्रीची पोलिसात तक्रार अशा बातम्या
वाचून मन उद्विग्न होते. कनिष्ठ दर्जाच्या ज्ञानी लोकांची उदाहरणे वर्तमानपत्रे, टी. व्ही. यांवरुन आपल्याला समजतात.
ह्या कनिष्ठ दर्जाच्या ज्ञानी बाबांना वेळीच ओळखून खड्यासारखे समाजातून बाजूला
करणे, हीच कै. नरेन्द्र
दाभोळकरांना खरी आदरांजली होईल व हाच खरा दत्तगुरुंचा जयजयकार असेल.
२)मध्यम दर्जाचे ज्ञानी
:-
मध्यम दर्जाचे
ज्ञानी लोक त्यांच्या स्वतःच्या शरीरात गुंतलेले नसतात. खूप काळ
तप साधना केल्याने त्यांची मने निर्जीव झालेली असतात. हे लोक
काम करीत नाहीत, कारण त्यांना ‘स्व’ची बाधा झालेली असते, म्हणजे त्यांना अंहकार झालेला असतो. जसा माणूस झोपेत चालतो, बोलतो तशा पद्धतीने हे लोक त्यांच्या
असलेल्या किमान जीवनावश्यक गरजांपुरते काम करतात. ते या जगात
वावरत नसल्यासारखे जगाच्या पलिकडे स्वतःच्याच धुंदीत वावरत असतात. ह्या लोकांना स्वतःची वर्तणूक कळत असते. हे लोक त्यांच्या
वासना व नशीब ह्यानुसार जगात वावरत असतात.
कोणत्याही व्यक्तीला
मध्यम दर्जाचा ज्ञानी ह्या श्रेणीत टाकण्याचा अधिकार आपला सर्वसामान्य लोकांचा नाही.
समाजात काही हुशार ज्ञानी माणसे खरोखरच त्यांच्या ज्ञानाच्या धुंदीत वावरताना
दिसतात. त्यांच्याकडे खरे ज्ञान असते परंतु
त्यांना जीवन जगण्याची कला येत नाहीत. हेच बहुतेक श्रीदत्तगुरुंनी
सांगितलेले, मध्यम दर्जाचे ज्ञानी लोक असावेत.
३) सर्वश्रेष्ठ दर्जाचा ज्ञानी :
सर्वश्रेष्ठ दर्जाचा
ज्ञानी माणसाच्या स्वतःविषयीच्या कल्पना शारीरिक नसतात. हे खरे ज्ञानी लोक असतात. हे ज्ञानी लोक आपले काम रथाच्या सारथ्यासारखे करतात.
ते कधीही स्वतःला तो रथ समजत नाहीत. कोणत्याही
कामात ते गुंतलेले नसतात, परंतू पहाणाऱ्याला मात्र ते त्यात खरोखरच
गुंतल्यासारखे दिसतात. ते त्यांचे काम नाटकातल्या नटासारखे चोख
करतात. जगाचे माय बाप असल्यासारखे जगाला सांभाळतात.
श्रीगुरुदेवांनी
सांगितलेले, सर्वश्रेष्ठ ज्ञानी आपल्याला श्रीकृष्णाच्या रुपाने
मिळालेले आहेत. महाभारतात अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करताना,
श्रीकृष्णाने अर्जुनास गीता सांगितली. ही भगवद्
गीता आजही ज्ञानामृताद्वारे जगाला मार्ग दाखवित आहे.
श्रीदत्तगुरुंनी
सांगितलेले ज्ञानी लोकांचे प्रकार पाहिल्यावर गुरु करतानाही त्या व्यक्तीतील गुण दोष नीट पारखून घ्यावेत. पूर्वी ब्रूसलीचा इंग्लिश सिनेमा ‘एन्टर द ड्रॅगन’ होता. ह्यात जुदो
कराटे शिकायला आलेला शिष्य जपानी प्रथेनुसार गुरुला वाकून अभिवादन करतो. क्षणात गुरु शिष्याच्या डोक्यावर फटका मारतो. शिष्य भेलकांडत खाली पडतो. शिष्याला आपली चूक
काय झाली? हे समजत नाही. गुरु त्याला सांगतो,
“कोणालाही अगदी गुरुलासुद्धा अभिवादन करताना नजर जागृक पाहिजे,
हाच आजचा तुझा धडा.”