कृतयुगाची
जयंती । पितरांस तर्पण अर्पिती ।
कार्याचा शुभारंभ करिती । केवी असे हा मुहुर्त ॥
अक्षय्य तृतीयेच्या
मुहुर्तावर सोने-चांदी, वाहन इत्यादी बाजारपेठा
फुललेल्या असताना; घरोघरी पारंपारिक पद्धतीने पितरांना तीळ तर्पण
श्रद्धेने करताना आढळतात. तसेच ह्या दिवशी वेलांच्या बियांचे बीजारोपण करण्याची प्रथा आहे.
बीजारोपणातून
नवन्मेषाची सुरवात होते. तर्पण विधीतून पूर्वजांच्या आत्म्याविषयी श्रद्धा व्यक्त होताना दिसते.
भारतीय संस्कृतीने मानलेल्या आत्म्याच्या
अस्तित्वाचे कोडे कधी सुटणार ?
काही लोकांना
ह्या अतीन्द्रिय शक्तीचे अस्तित्व सोनेरी प्रकाश अथवा गोळे स्वरुपात दिसतात,
असे आपण ऐकतो.
२००१-०२ मध्ये उन्हाळ्यात कोकण ट्रीपहून परतीच्या प्रवासात आळंदी येथील ध्यान-मंदिरात दर्शनासाठी
गेलो होतो. आमच्या ग्रुपमधील एका बाईंना खाली बसता येत नव्हते.
ध्यान धारणा न शिकलेली ही व्यक्ती डोळे
मिटून उभी होती. आम्हाला वाटले बाई उभ्या-उभ्या(नेपोलियनसारख्या)झोपल्या.ध्यान-मंदिरात बोलायचे नसल्याने
मी व माझी मैत्रीण त्या बाईंना हलवून जागे करायचा प्रयत्न करीत होतो. थोड्या वेळाने बाई
त्या अवस्थेतून बाहेर आल्या. त्यांना सोनेरी सिंहासन व त्यावर
असलेला चांदीचा गोळा वर-वर जाताना मनःचक्षुसमोर दिसत होता.
हे दृश्य डोळ्यासमोरुन संपेपर्यंत, त्या बाईंना
देहभान हरपलेली अवस्था जाणवली. आम्ही लोकांनी ‘उभ्या-उभ्या झोप लागली’ म्हणून
चिडविले. गंमतीचा भाग सोडला तरी, ह्या स्थितीची
शास्त्रीय मीमांसा काय असू शकेल ?
देहभान जागरुक असताना आत्मतत्वावरील नियंत्रण मी पाहिलेले
आहे. मी ११-१२वी असताना आमच्याकडे आमचे एक नातेवाईक
आले होते. रामदासी पंथ
स्विकारलेले हे नातेवाईक कधी नासिकला
आले तर महिना-पंधरा दिवस आमच्या घरी रहात असत. सकाळी त्यांची योगासने, पूजा -अर्चा
असा प्रदीर्घ कार्यक्रम सकाळी चालत असे. एकदा गप्पा मारताना मी
गंमतीने म्हणाले, “सगळ्यात सोपे शवासन!” तेव्हा ते रामदासी बुवा म्हणाले, “उद्या सकाळी मी तुला
शवासन दाखवितो.” दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी शवासन करण्यापूर्वी
मला सांगितले, “मी साधारण २० मिनिटे मुखाने रामनाम म्हणत,
शवासन करीन. माझ्या शरीराचा कोणताही अवयव उचललास
तर तो
एखाद्या दगडासारखा खाली पडेल. फक्त घाबरुन मला उठवू नकोस,
मी २० मिनिटांनी मी शवासनातून बाहेर येईन.”त्यांनी
सांगितल्याप्रमाणे त्यांचे मस्तकाखालचे शरीर खरोखरच प्रेतासारखे खाली पडत होते.
ते तोंडाने घेत असलेले ‘रामनाम’ ही त्यांच्या जिवंत अस्तित्वाची खूण होती.
रामदासी बाबांचे
त्यांच्या शरीरावर मनावर नियंत्रण होते,
पण माझ्या अनुभवातून मन हे खरोखरच बाहेरच्या विश्वात फेरफटका मारु
शकत असेल का? बालपणी आमच्या ‘आदर्श मराठी
शाळेला’ उन्हाळ्याच्या सुट्टी लागली होती. माझे वडील पुणे विद्यापीठात कोणता तरी कोर्स करण्यासाठी १- महिना पुण्याला गेले होते. दुपारी मला बाहेर खेळायला
जायचे वेध लागले होते. माझ्या लांब-जाड केसांची वेणी घालण्याची आई कसरत करीत होती. त्याकाळात घराचे दार उघडे ठेवणाऱ्या समाजात वेणी
घालण्याचे बंधन मला नको
होते. खेळायला जाण्याचे वेध लागलेले असताना, हातात बॅग घेतलेले
बाबा मला C.B.S.वर बसमधून उतरताना मला दिसत होते. बसमधून घरी येणारी
बाबांची हातात नवी बॅग घेतलेली मुर्ति, त्यांच्या अंगावरील कपड्याच्या
रंगासह मी आईला सांगत होते. अशोकस्तंभला वळसा घालून पायी घरी येणारे बाबा मला दिसत होते, मी सांगत होते. माझ्या ह्या बाबा-वेडेपणामुळे वैतागलेली आई “मला नीट वेणी घालू दे.
सरळ बस. सारखे बाबा - बाबा
करु नकोस” म्हणून मला रागवत होती. मी केलेल्या
वर्णनानुसार बाबा खरच घराच्या दारांत येऊन उभे राहिले.
मला दिसलेल्या
ह्या भासाचे उत्तर शास्त्रीय परिभाषेत मिळू
शकेल का ?
याचे उत्तर
Nano-Technologyचे जनक
भौतिकशास्त्रज्ञ रीचर्ड फेनमन ह्यांच्या चरित्रात मिळते. नोबेल
प्राइज विजेता असलेला हा
भौतिकशास्त्रज्ञ स्वतः उत्तम ‘वादक व चित्रकार’ होता. ‘बाबा रामदास’ हा भारतीय
गृहस्थाकडून हसतखेळत जीवन जगणारा हा अवलिया संशोधक ध्यान करणे शिकला. ध्यान अवस्थेत फेनमन स्वतःला बाहेरुन पाहू शकले. फेनमन ह्यांचा स्वतःच्या शरीरावर ताबा होता. स्वतःची
हात बोटे हलविताना, ते स्वतःला पाहू शकत होते. बालपणीच्या आठवणी फेनमन ह्यांनी सुसंगत पाहिल्या. मादक
द्रव्याचे सेवन केल्यावर फेनमन
ह्यांच्या मते ध्यान अवस्था लवकर साध्य होते. सिंहस्थ काळात साधू लोकांच्या मादक
सेवनाच्या चर्चा आपण ऐकतो. मेंदूतील रासायनिक प्रक्रिया मादक
द्रव्याने घडविण्यापेक्षा, श्वास-नियंत्रणाच्या सहाय्याने
आत्माचे अस्तित्व शोधण्यास,
सांगते ही
तृतीया अक्षय्य। अंधश्रद्धेचा
करोनि क्षय।
श्रद्धेत गमे
शास्त्रीय लय। शोधण्या आत्म्याचे अस्तित्व॥
अनुप्रभा, नाशिक
www.shrigurucharitra.com
संदर्भ : ‘रिचर्ड फेनमन - एक अवलिया संशोधक’
लेखिका मादुरी शानभाग राजहंस
प्रकाशन
ISBN 91-81-7434-566-0