{सत्य घटनेवर आधारित कथा}
त्यादिवशी भोसला मिलिटरी स्कूलमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शाळेतील विद्यार्थीवर्ग, अध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग सर्वजण कामात
दंग होते. मधूनमधून मुख्याध्यापकांची फेरी होत
होती व ते सूचना देत होते. कोणी शाळेची स्वच्छता करण्यात
दंग होते, तर कोणी वर्ग सजावटीत दंग होते. अध्यापक वर्ग मुलांच्या कामावर लक्ष ठेवून बोर्डवर सुविचार, सुभाषिते विद्यार्थ्यांकडून लिहून घेत होते.
कर्मचारीवर्ग घोडे व घोड्याची पागा, कवायतीचे ग्राऊंड,
मेसची जागा, शुटींगचे ग्राऊंड स्वच्छ करण्यात गढला
होता.
उद्या ब्रिटीश अधिकाऱ्याची
शाळेला अचानक भेट होणार होती. ते १९४२ साल
होते. देश गांधींच्या ‘चले जाव’ चळवळीने भारावलेला होता. इंग्रजांची सत्ता उखडून टाकून देश स्वतंत्र करावयाच्या
ईर्षेने भारतीय जनता पेटून उठली होती. असहकाराचे अस्त्र पुकारले गेले. सत्याग्रह, मोर्चे, प्रभात फेऱ्या, रेल्वे रूळ तोडणे, टेलीफोनच्या
तारा तोडणे असे अनेक मार्ग हाताळण्यात आले. इंग्रज राज्यकर्ते धरपकड, गोळीबार, लाठीमार वगैरे अनेक
तंत्राचा वापर करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न करीत होते.
अशा तंग
वातावरणात ब्रिटीश अधिकाऱ्याची शाळेला भेट होती. ‘सत्तेपुढे शहाणपण काय कामाचे!’ ब्रिटीश अधिकाऱ्याचे स्वागत करणे, संस्थेला प्राप्त होते.
दुसरे दिवशी ब्रिटीश
अधिकाऱ्याचे लवाजम्यासह आगमन झाले. मिलिटरी स्कूल असल्यामुळे लष्करी पद्धतीने शिस्तीत स्वागत झाले. बॅंड पथकाच्या साथीने कवायत, राईडिंग, स्वीमिंग, शुटींग वगैरे उपक्रम क्रमाक्रमाने दाखविण्यात
आले. नियोजनबद्ध कार्यक्रम पाहून पाहुण्यांच्या चेहऱ्यावर समाधान विलसत
होते.
कार्यक्रम संपल्यावर
सर्व विद्यार्थी असेंब्लीत एकत्रित झाले. व्यवस्थित युनिफॉर्ममधले शिस्तीत
बसलेले विद्यार्थी, कार्यक्रमाची शोभा वाढवित
होते. सर्वत्र शांतता होती.
मुख्याध्यापकांचे पाहुण्यांसमवेत व्यासपीठावर आगमन झाले. कार्यक्रमाची सुरुवात झाली. इतक्यात विद्यार्थ्यांमधून एक मोठा आवाज आला, ‘गांधीजी की
जय।‘ समारंभाचा बेरंग झाला. ब्रिटीश अधिकारी रागाने लाल झाले. मुख्याध्यापक व अध्यापकवर्ग गोंधळून गेला. ताबडतोब कार्यक्रम आटोपता घेतला गेला.
संपूर्ण शाळा गोंधळून गेली. ‘ब्रिटीश सरकार काय निर्णय
घेईल ?’ मोठा प्रश्न
निर्माण झाला. म्हणतात ना, ‘ज्याच्या हाती
सत्ता, तो मारी लत्ता’.
त्यादिवशी तब्येत
बरी नसल्यामुळे, ‘डॉक्टर मुंजे’ ह्या कार्यक्रमाला
उपस्थित नव्हते.अखिल भारताचे एक छोटेसे जिवंत प्रातिनिधिक चित्र
असलेल्या ह्या शाळेची विद्यार्थी संख्या जेमेतेम
१०० होती. काही वर्षे ही विद्यार्थी
संख्या ६० - ६५ पर्यंत कमी होती.
देशाला स्वातंत्र्य
मिळविण्याकरता व देशाचे स्वातंत्र्य टिकविण्याकरिता, ऐन परकीय
अंमलात १९३७ साली डॉक्टर बा. शी. मुंजे
ह्या द्रष्ट्या नेत्याने ही शाळा नाशिक येथे स्थापन केली. ब्रिटीश
सरकारचा अतिशय जाच असताना, डॉ मुंजेंनी ही शाळा एका विशिष्ट्य
हेतूने काढली व चालविली. डॉक्टर साहेबांचे लक्ष्य भारतीय सैन्याचे
भारतीयकरण करण्याकडे व तसेच अन्य सरकारी कारभारांत लागणाऱ्या अधिकाऱ्यांत
योग्य असे भारतीय तरुण निर्माण करण्याकडे होते. त्या काळच्या लोकसभेत त्यांनी महनीय कामगिरी केली. त्यामुळेच ब्रिटीश सरकारलाही मनांतून इच्छा नसतानाही
ह्या शाळेला परवानगी द्यावी लागली.
डॉक्टर साहेबांच्या
कार्यप्रणालीत ‘शाळा व राजकारण’ ही दोन
भिन्न गाठोडी होती. ते आपल्या भाषणांत सांगत असत, “मी माझे राजकारणाचे गाठोडे
नाशिकरोड स्टेशनवर ठेवून शाळेत येतो व परत राजकीय कामासाठी जाताना, स्टेशनवरुनच ते गाठोडे उचलून नाशिक बाहेर जातो.” राजकारणाचा
वारा न लागलेली शस्त्र व शास्त्र पूजक संस्था धर्मसंकटात पडली होती. डॉक्टरसाहेबांची झालेल्या प्रकारावर प्रतिक्रिया
काय असेल?
शस्त्र सामर्थ्यावर विश्वास ठेवणारे ‘डॉक्टर मुंजे’
तर अहिंसेचे पुजारी ‘गांधीजी’ दोघांचे राजकीय मार्ग भिन्न, परंतु ‘भारतीय स्वातंत्र्य मिळविणे’ हे एकच ध्येय.
डॉक्टर साहेबांनी
त्या विद्यार्थ्याला बोलावून घेतले. बिछान्यावर झोपलेले डॉक्टरसाहेब
त्या मुलाला म्हणाले, “तू तुझ्या वयाप्रमाणे योग्यच केले.
मी तुझ्या वयाचा असतो तर हेच केले असते. परंतु
एक लक्षात घे, ते इंग्रज अधिकारी आपल्या शाळेत पाहुणे
म्हणून आले होते. आपली भारतीय संस्कृती
सांगते, ‘अथिती देवो भव।‘ घरी आलेल्या पाहुण्याचा अपमान करणे चूक आहे.
जीवनांत पुन्हा अशी चूक करु नकोस.”
डॉक्टर साहेबांच्या
खोलीतून तो रामदंडी विद्यार्थी एक नवीन धडा घेऊन बाहेर पडला. शाळा पूर्ववत चालू झाली. डॉक्टरसाहेबांनी
प्रकरणावर पडदा कसा टाकला? हे कोणालाच समजले नाही.
ब्रिटीश
सरकारच्या जाचाबरोबर, पराकोटीचा आर्थिक ताण सहन करीत असलेल्या
भोसला शाळेने, अनेक भूमीगत स्वातंत्र्यसैनिकांना लपण्यासाठी आश्रय देऊन स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले.
इंग्रजी ‘कॅडेट’ शब्दास भारतीय प्रतिशब्द ‘रामदंडी’ वापरुन डॉक्टर मुंजेंनी
‘पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा आदर्श’ विद्यार्थ्यांसमोर ठेवला. भोसला मिलिटरी
स्कूलच्या माजी रामदंडींनी भारतीय लष्कर, सरकारी विभाग, शिक्षण क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, वैद्यकीय व्यवसाय, शेती अशा विविध क्षेत्रांत
दिलेल्या योगदानाद्वारे डॉक्टर मुंजेचे सक्षम भारताचे स्वप्न साकारलेले आहे.
श्रीमती प्रभा आठवले
माजी शिक्षिका, ग. ग. हायस्कूल, नाशिक