उत्सवे व्यसने चैव दुर्भिक्षे शत्रुसंकटे ।
राजद्वारे स्मशाने च यः तिष्ठति स बान्धवः ॥१-१२॥ --- चाणक्यनीतिः
[अर्थ :- उत्सवप्रसंगी, संकटात, दुष्काळात, शत्रूपासून धोका उत्पन्न झाला असता, राजाच्या दरबारात; एवढेच नव्हे, तर स्मशानातसुद्धा जो आपल्यामागे उभा राहतो, तोच खरा आप्त.]
आर्य चाणक्याचे
वर्णन सार्थ ठरविणारी ‘आठवले – करंदीकर’
ही मैत्र-जोडी दि. ११ डिसेंबर
२०१६ रोजी, बापूसाहेब करंदीकरांना देवाज्ञा होऊन, काळाच्या पडद्याआड गेली.
नियतीने दोघाही मित्रांच्या
गमनाची तारीख ११ नेमून ह्या ‘एकरुप मैत्रीची’ आठवण करुन दिली. ह्या दोन मित्रांच्या जोडीतील प्राध्यापक रा. द. आठवले दि. ११ जुलै १९९५ रोजी
इहलोक सोडून गेले. भावी आयुष्यात, प्राध्यापक मनोहर रघुनाथ (बापूसाहेब) करंदीकरांनी मैत्रीचा घेतलेला वसा सोडला नाही.
आठवले नसल्यामुळे ‘आठवलेच्या घरी सर्व व्यवस्थित
चालले आहे ना !’ हे पहाण्यासाठी ते मुद्दाम नाशिकला येऊन ३-४ दिवस रहात असत. अन्यथा हल्लीच्या तांत्रिकयुगात फोनवर
खुशाली कळाली की काम भागते !
नाशिकच्या भोसला मिलिटरी
स्कूलमध्ये ‘आठवले – करंदीकर’ मैत्रीचा अंकूर
रुजला. इयत्ता ५ वी ते ११ वी हे दोघे मित्र ‘डॉक्टर बा. शि. मुंजे’ ह्या उतुंग व्यक्तिमत्वाच्या छायेखाली लहानाचे मोठे झाले. वसतीगृहांत रहाणारी ही मुले आपोआप शाळा - कुटुंबाचे सदस्य झाली.
ही मुले भोसलात शिकत
असताना पारतंत्र्यातील भारत देश महात्मा गांधींच्या ‘चले जाव’ घोषणेने पेटून उठलेला
होता. शाळेत मधून मधून भूमीगत स्वातंत्र्यसैनिकांचा शोध घेण्यासाठी पोलीस पार्टी
येत असे. शाळेत मुलांच्या कानावर थोडी
कुजबूज पडत असे. परंतु शाळेत लपलेला भूमीगत ह्या
कानाचे त्या कानाला कळू न देता सुखरुप ठिकाणी रवाना झालेला असे. ‘हे भूमीगत लोक कोण आहेत ?, शाळेत कुठे रहातात ?’, ह्याविषयी
मुलांना काहीच कळत नसे. डॉ. मुंजे स्वतः
हिंदू महासभेचे मोठे नेते असूनही, त्यांनी मुलांचे भावविश्व
सुरक्षित जपले. डॉक्टर मुंजे ह्या द्रष्ट्याच्या
मते विद्यार्थ्यांची ही पिढी स्वतंत्र भारताची पायाभरणी करणार आहे. त्यामुळे ही पिढी सैनिकी शिक्षणासहित सक्षम झाली
पाहिजे. ते स्वतः भाषणात सांगत, “मी नाशिक-रोड स्टेशनवर माझे राजकारणाचे गाठोडे ठेवून देतो व शाळेचे गाठोडे घेऊन शाळेत
येतो. परत जाताना गाठोड्यांची अदलाबदल करुन राजकारणाचे गाठोडे
घेऊन, नाशिक-रोड स्टेशनवरुन नाशिक बाहेर
जातो.” मुले जशी राजकीय विश्वापासून दूर होती, तसेच शाळेत रहाणारे भूमीगत स्वातंत्र्यसैनिक
सर्व पक्षांचे होते.
बाळ आठवले व बापू करंदीकर
दोघेही एका वर्गातील सरळ मार्गी, हुशार विद्यार्थी परंतु दोघांमध्ये स्पर्धेची भावना कधीच न डोक्यावल्याने, त्यांची मैत्री निर्भेळ राहिली. दोघांचे स्वभाव मुलतः विरुद्ध. करंदीकर अतिशय वक्तशीर; गरज पडली तर १८ तास काम करणारे आठवले
स्वभावतः आळशी. करंदीकर अतिशय
मितभाषी तर आठवलेचा ‘गप्पा मारणे म्हणजे जीवनातील प्राणवायू’.
दोघा मित्रांमध्ये एका बाबतीत किंचित साम्य होते. एखादी गोष्ट पटली नाही किंवा काही कोणाशी काही मतभेद झाले
तर दोघेही वाद घालणार नाहीत, भांडण करणार नाहीत. निषेधाची अभिव्यक्ती
मात्र भिन्न होत असे. करंदीकर मिश्किल
हांसून व्यक्त होत तर आठवले आपले मत एकदा मांडून
बाजूला होई.
मित्र मंडळींमधील
गप्पामधून एका वरच्या वर्गातील मित्राकडून बालचमुला राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाची माहिती मिळाली. ‘शाखेवर चांगले संस्कार होतात’,
वगैरे गोष्टींमुळे मुलांची उत्सुकता ताणली गेली. सिनिअर मित्रांबरोबर बालचमुही शाळेबाहेर भरणाऱ्या एका शाखेवर जाऊ लागला. एके दिवशी संघ शाखेवर वाजविलेली बॅण्डची धून ‘प्राचीन भारतीय’ असल्याचे बौद्धिक कोणीतरी
घेतले. आठवले स्वतः उत्कृष्ट वादक असल्याने, त्याने उभे राहून सांगितले, “ही प्रसिद्ध जॉर्जिया धून आहे. तुम्ही आत्ता त्या धूनचा थोडा
भाग वाजवून दाखविला आहे. मला संपूर्ण धून वाजविता
येते. मी ती तुम्हाला वाजवून दाखवितो.”
आठवलेचे सांगणे शाखा चालकांना पटले नसावे. आठवलेने
संघ शाखेत जाणे बंद केले. करंदीकरांनी मात्र ‘सच्चा संघ स्वयंसेवक कसा असतो?’ हे स्वतः भावी जीवनांत
दाखवून दिले. बालविश्वात संघाची कल्पना रुजविणारा,
वरच्या वर्गातील मित्र, भावी जीवनांत इंदिरा गांधींचा
विश्वासू सहकारी झाला. स्वकर्तुत्वाने ही व्यक्ती केंद्रिय राजकारणात
आदरणीय झाली.
शालेय जीवनाची
सांगता करणाऱ्या ११वी मॅट्रिकच्या परिक्षेच्या १५ दिवस आधी आठवलेचे
वडील हार्ट अॅटॅकने वारले. ‘वर्ष वाया जाऊ नये’
म्हणून आठवलेने परीक्षा दिली. दोघेही मित्र उत्तम
मार्कांनी पास झाले.
पुढील शिक्षणासाठी दोघाही मित्रांनी
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात B.Sc. साठी प्रवेश घेतला. डेक्कन जिमखान्यावरील बंगल्यातील एक खोली करंदीकर कुटुंबाने मुलाच्या मित्राला
दिली. ह्या खोलीने दोघांच्या
मैत्रीतील वीण घट्ट केली. बापूसाहेबांची आई (कै. बाई करंदीकर) प्राध्यापक आठवलेंना नेहमी म्हणायच्या, “आठवले, तुमची खोली शुभ ठरली. तुमच्यानंतर, ह्या खोलीत राहिलेला प्रत्येक विद्यार्थी जीवनात यशस्वी होऊन आम्हाला खूप समाधान देणारा
ठरला.”
१९४८
साली संघावर आलेल्या बंदीत बापूसाहेब करंदीकर डिसेंबर ते जुलै असा ९ महिन्यांचा कारावास
भोगून परत आले. घरी परतल्यावर
त्यांनी अर्धवट राहिलेले B.Sc. पूर्ण केले. रसायन शास्त्रात M.Sc. ही पदवी संपादन करुन, ते संघ प्रचारक झाले. प्रांत संघ चालक स्व. बाबाराव भिडे यांनी त्यांना मराठवाड्यात संघ कार्यासाठी पाठविले.
इयत्ता
पाचवी पासून सुरु झालेला दोघा मित्रांचा जीवन- प्रवाह अलग झाला.
आठवले नाशिकच्या H.P.T. कॉलेजमध्ये पदार्थविज्ञानाचे
Demonstrator म्हणून रुजू झाले.
जालन्याच्या J.E.S. कॉलेजमध्ये करंदीकरांनी रसायनशास्त्राचे अध्यापन सुरु केले. बापूसाहेबांच्या
माता-पित्यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे आठवलेच्या गृहस्थाश्रमाच्या
प्रवेशास शुभार्शिवाद दिले.
मराठवाड्यात
रसायनशास्त्र अध्यापन करीत असताना, स्वतःचे कुटुंब सांभाळून बापूसाहेबांनी संघ कार्याची पायाभरणी केली.
करंदीकरांचे रात्रंदिवस संघ कार्याचे असितधारा व्रत
सुरु झाले. राजसत्ता विरोधात असल्याने अनेक संकटांचा न डगमगता सामना करावा
लागत असे.
मराठवाड्यातील
गावागावांमध्ये विज्ञान प्रसाराचे कार्य करीत असताना, प्राध्यापक करंदीकरांनी संघाच्या विविध जबाबदाऱ्या
समर्थपणे पेलल्या. अनेक वर्षे ते जालना जिल्हा
संघचालक होते. जालन्याच्या सामाजिक, सांस्कृतिक,
शैक्षणिक घडामोडीत बापूसाहेबांचे मोठे योगदान आहे. जालना जिल्ह्यातील पाणी प्रश्न तसेच सार्वजनिक स्वच्छता अभियान प्राध्यापक
करंदीकरांनी यशस्वीपणे राबविले.
इसवी सन
१९७५ साली आणीबाणीत मिसा कायद्यांतर्गत
बापूसाहेब करंदीकर नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये १९ महिने स्थानबद्ध
होते. प्राध्यापक आठवले नित्यनियमाने करंदीकर व त्यांच्या
सहकाऱ्यांना भेटायला जात असत. आठवलेसरांना
ओळखणाऱ्या एका जेलच्या अधिकाऱ्याने सांगितले, “सर, इथे भेटायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद होत असते व ही नोंद रोज वरती
पाठवली जाते.” आठवले सर म्हणाले, “मला ह्या नोंदीची पर्वा नाही.” आणीबाणीचे काळे पर्व संपले. बापूसाहेब परत आपल्या समाज
साधनेत व्यग्र झाले.
मार्च
२०१२ साली अचानक आठवलेंच्या घरी बापूसाहेबांचा फोन आला. “माझ्या
नागरी सत्काराला तुम्ही दोघी मायलेकींनी उपस्थित रहावे,अशी माझी
इच्छा आहे.” बापूसाहेबांच्या समाजसेवेचा, जालना रहिवाशांनी केलेला नागरी सत्कार ‘न भूतो न भविष्यति’
असा होता. अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रमांत,
सर्व प्रथम बापूसाहेबांचा जीवनपट (Video)दाखविला. सर्व पक्षीय तसेच सर्व धर्मीय लोक अहमहिकेने स्टेजवर बापूसाहेबांचा
सत्कार करताना दिसत होते.
जालना नागरी
समितीच्या वतीने बापूसाहेबांना रु. १ लाख ११ हजार १११ रुपयांची
थैली अर्पण केली. ह्या निगर्वी संघ साधकाने (बापूसाहेब करंदीकर) तेवढेच
स्वतःचे पैसे त्या थैलीत घालून समितीला देणगी दिली. ‘देणगीचा विनियोग जालना गावासाठी आवश्यक असलेल्या
योजनेत करावा. ”, असे सांगून बापूसाहेबांनी स्वतःच्या निस्पृहतेचे दर्शन जगाला दिले.
संघ कार्य करताना
सर्व नागरिकांचा एक संघ बनविणाऱ्या बापूसाहेब करंदीकर ह्या जगन्मित्राला शतशः प्रणाम।
अनुप्रभा, नाशिक
www.shrigurucharitra.com