२१व्या शतकातील यांत्रिक युगांत यंत्राने, एकमेकांशी संवाद साधणारा
मनुष्य मनामनांतील सुसंवाद विसरत चाललेला तर नाही ना ? वास्तविक व्यक्तीव्यक्तीमध्ये संवाद साधण्याचे माध्यम
भाषा आहे. भाषा ह्या माध्यमामुळे पोटासाठी दाही दिशा हिंडणारा मानव, आजचे प्रगत युग निर्माण करु शकला. भाषा ही व्यक्ति-व्यक्तींमध्ये जिव्हाळा निर्माण करते. कोणताही कार्यक्रम
समारंभ असो किंवा जमलेली गर्दी असो, समभाषिक लोक नकळत एकत्र येतात. त्यांचा एक गट निर्माण
होतो. भाषा ही जणू लोहचुंबक आहे.
याठिकाणी मला एक अनुभव
नमूद करावासा वाटतो, आम्ही माझी मुलगी व मी कन्याकुमारीला गेलो
होतो. तेथे आम्हाला विवेकानंद स्मारकाला भेट द्यायची होती. विवेकानंद स्मारक या ठिकाणी बोटीने जावे लागते. बोटीला
प्रवाश्यांची खूप गर्दी होती. चढणे मुष्किल होते. कसेतरी आम्ही बोटीत पाय ठेवला अन् बोट सुरु झाली. प्रवासी
बहुभाषिक होते. त्यांचे बोलणे आम्हाला समजत नव्हते तसेच आमचे
बोलणे त्यांना समजत नसावे. आम्ही दोघी मायलेकी मराठीत गप्पा मारत
होतो. आमचे बोलणे ऐकून ५-६ तरुण मुले आमच्याजवळ
आली. मराठी भाषेमुळे आमचा गट निर्माण झाला. गप्पांच्या ओघांत कळाले की ही मुले आमची गाववाली (नाशिक-रोड) होती. एका साधू बाबाबरोबर कन्याकुमारी फिरायला आलेली होती. साधुबाबा, ती तरुण मुले व आम्ही दोघी अशा ग्रुपने कन्याकुमारी
प्रवासाचा आनंद लुटला. ह्या छोट्याश्या प्रवासांत मी त्या ग्रुपची
मावशी व माझी मुलगी त्यांची ताई झाली.
आम्हाला मराठी भाषेने
मिळालेला आनंददायी प्रवास आजची शास्त्र-सिद्ध पिढी उपभोगू शकेल
का? हल्लीच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत भाषा विषय सोडून १०वी
होण्याची सोय आहे ! हे ऐकून धक्का बसतो.
माझ्या मैत्रिणीचा गणित
सायन्स विषयाची आवड असणारा नातू खूप हुशार आहे. हा हरहुन्नरी
मुलगा सतत सर्किटची मोडतोड - जुळवाजुळव अशी धडपड करीत असतो.
सहज गप्पा मारताना तो महत्त्वाकांक्षी
मुलगा म्हणाला, “भाषा विषय एकदम भुक्कड! भाषा विषय सोडून मी फक्त गणित शास्त्र विषयांचा ग्रुप घेतलेला आहे.”
असा हा महत्त्वाकांक्षी मुलगा त्याच्या शास्त्र
ज्ञानावर स्वतःचे आयुष्य घडविणार परंतु आयुष्य घडविणे म्हणजे फक्त पैसा मिळविणे होते
का ?
नुकतेच आयर्लंड मध्ये आयरिश शाळकरी
मुला मुलींनी संस्कृत श्लोक म्हणून
ॐ शांतिः शांतिः शांतिः ।
अशा शब्दांमध्ये केलेले आपल्या पंतप्रधानांचे
(माननीय श्री. नरेन्द्र मोदीजी) स्वागत सर्व जगाने पाहिले. आयरिश शाळांमध्ये अमृतवाणी
म्हणून ‘संस्कृत विषय’ मुद्दाम शिकविला
जातो.
ज्या
भारताने जगाला संगणकीय संस्कृत भाषा दिली त्याच
भारताच्या काही शाळांमधून संस्कृत सहित सर्व मातृभाषा हद्दपार होताना दिसत आहेत.
भाषा
विषय ऐच्छिक ठेवल्याने, साहित्याची ओळख नसलेली विद्यार्थ्यांची
पिढी विज्ञान शिक्षणाद्वारे यंत्राची भाषा शिकतील परंतु मानवी मनाची भाषा विसरल्याने
मनःशांति कशी मिळवतील ?
भाषा विषय ऐच्छिक ठेवणाऱ्या २१व्या शतकातील शिक्षणक्षेत्राला, कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या शब्दसामर्थ्याचा आधार घेत द्यावासा वाटलेला भुक्कड*
सल्ला २
कशाला नसत्या चिंता खंती
सवे आणवू रौप्य धने
यांत्रिकी दाटता जीवनी
जगणार कसे शांत मने ?
अनुप्रभा, नाशिक
संदर्भ:-
कविवर्य बा. भ. बोरकर
यांच्या ‘कांचनसंध्या’ कवितेतील दुसरे कडवे
कशास नसत्या चिंता खंती
वेचू पळती सौम्य उन्हे
तिमिर दाटता बनुनि चांदणे
तीच उमलतील संथपणे
* भुक्कड = निरुद्योगी, बुभुक्षित (भुकेला हपापलेला गरजू )
|