Sunday 28 May 2017

मायबोलीचे भुक्कड २

                            २१व्या शतकातील यांत्रिक युगांत यंत्राने, एकमेकांशी संवाद साणारा मनुष्य मनामनांतील सुसंवाद विसरत चाललेला तर नाही ना ? वास्तविक व्यक्तीव्यक्तीमध्ये संवाद साण्याचे माध्यम भाषा आहे. भाषा ह्या माध्यमामुळे पोटासाठी दाही दिशा हिंडणारा मानव, आजचे प्रगत युग निर्माण करु शकला. भाषा ही व्यक्ति-व्यक्तींमध्ये जिव्हाळा निर्माण करते. कोणताही कार्यक्रम समारंअसो किंवा जमलेली गर्दी असो, समभाषिक लोक नकळत एकत्र येतात. त्यांचा एक गट निर्माण होतो. भाषा ही जणू लोहचुंबक आहे.
                                याठिकाणी मला एक अनुभव नमूद करावासा वाटतो, आम्ही माझी मुलगी व मी कन्याकुमारीला गेलो होतो. तेथे  आम्हाला विवेकानंद स्मारकाला भेट द्यायची होती.   विवेकानंद स्मारक या ठिकाणी  बोटीने जावे लागते. बोटीला प्रवाश्यांची खूप गर्दी होती. चढणे मुष्किल होते. कसेतरी आम्ही बोटीत पाय ठेवला अन् बोट सुरु झाली. प्रवासी बहुभाषिक होते. त्यांचे बोलणे आम्हाला समजत नव्हते तसेच आमचे बोलणे त्यांना समजत नसावे. आम्ही दोघी मायलेकी मराठीत गप्पा मारत होतो. आमचे बोलणे ऐकून ५-६ तरुण मुले आमच्याजवळ आली. मराठी भाषेमुळे आमचा गट निर्माण झाला. गप्पांच्या ओघांत कळाले की ही मुले आमची गाववाली (नाशिक-रोड) होती.   एका साधू बाबाबरोबर कन्याकुमारी फिरायला आलेली होती. साधुबाबा, ती तरुण मुले व आम्ही दोघी अशा ग्रुपने कन्याकुमारी प्रवासाचा आनंद लुटला. ह्या छोट्याश्या प्रवासांत मी त्या ग्रुपची मावशी व माझी मुलगी त्यांची ताई झाली.
                                आम्हाला मराठी भाषेने मिळालेला आनंददायी प्रवास आजची शास्त्र-सिद्ध पिढी उपभोगू शकेल का? हल्लीच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत भाषा विषय सोडून १०वी होण्याची सोय आहे ! हे ऐकून धक्का बसतो.
                                   माझ्या मैत्रिणीचा गणित सायन्स विषयाची आवड असणारा नातू खूप हुशार आहे. हा हरहुन्नरी मुलगा सतत सर्किटची मोडतोड - जुळवाजुळव अशी धडपड करीत असतो. सहज गप्पा मारताना तो महत्त्वाकांक्षी मुलगा म्हणाला, “भाषा विषय एकदम भुक्कड! भाषा विषय सोडून मी फक्त गणित शास्त्र विषयांचा ग्रुप घेतलेला आहे.”
                                    असा हा महत्त्वाकांक्षी मुलगा त्याच्या शास्त्र ज्ञानावर स्वतःचे आयुष्य घडविणार परंतु आयुष्य घडविणे म्हणजे फक्त पैसा मिळविणे होते का ?
                         नुकतेच आयर्लंड मध्ये आयरिश शाळकरी मुला मुलींनी संस्कृत श्लोक म्हणून
ॐ शांतिः शांतिः शांतिः ।
अशा शब्दांमध्ये केलेले आपल्या  पंतप्रधानांचे (माननीय श्री. नरेन्द्र मोदीजी) स्वागत सर्व जगाने पाहिले. आयरिश शाळांमध्ये अमृतवाणी म्हणून संस्कृत विषयमुद्दाम शिकविला जातो.
                               ज्या भारताने जगाला  संगणकीय संस्कृत भाषा दिली त्याच भारताच्या काही शाळांमधून संस्कृत सहित सर्व मातृभाषा हद्दपार होताना दिसत आहेत.
                               भाषा विषय ऐच्छिक ठेवल्याने, साहित्याची ओळख नसलेली विद्यार्थ्यांची पिढी विज्ञान शिक्षणाद्वारे यंत्राची भाषा शिकतील परंतु मानवी मनाची भाषा विसरल्याने मनःशांति कशी मिळवतील ?
                                भाषा विषय  ऐच्छिक ठेवणाऱ्या  २१व्या शतकातील शिक्षणक्षेत्राला, कविवर्य बा. . बोरकर यांच्या शब्दसामर्थ्याचा आधार घेत द्यावासा वाटलेला  भुक्कड* सल्ला २
कशाला नसत्या चिंता खंती
सवे आणवू रौप्य धने
यांत्रिकी दाटता जीवनी
जगणार कसे शांत मने ?
अनुप्रभा, नाशिक

संदर्भ:-
कविवर्य बा. . बोरकर यांच्या कांचनसंध्याकवितेतील  दुसरे कडवे
कशास नसत्या चिंता खंती
वेचू पळती सौम्य उन्हे
तिमिर दाटता बनुनि चांदणे
तीच उमलतील संथपणे

* भुक्कड = निरुद्योगी, बुभुक्षित (भुकेला हपापलेला गरजू )

Thursday 11 May 2017

मायबोलीचे भुक्कड १

                                       गेल्या आठवड्यात मी बसची वाट पहात बसस्टॉपवर उभी होते. इतक्यात माझ्या मैत्रिणीची नात तिथे आली. आमच्या गप्पा सुरु झाल्या. ती चांगल्या तऱ्हेने पास होऊन, अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी जाण्याच्या प्रयत्नांत होती. ते ऐकून मलाही बरे वाटले. ती उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाणार, एवढीशी पाहिलेली चिमुकली ! मनाप्रमाणे शिक्षण घेऊन उच्चशिक्षित विदूषी म्हणून समाजात वावरणार, किती आनंद वाटला सांगू पण ----

                                         थोड्याच सेकंदात त्या आनंदावर विरजण पडले. काय झाले ? एक खेडूत एक पत्र घेऊन आमच्याजवळ आला व ती तरुण मुलगी पाहून तो तिला म्हणाला, “बाळ, ह्या पत्रात काय लिवलय ? ते वाचून दाखीव बरं.” त्या मुलीने ते पत्र हातात घेतले व लगेच म्हणाली, “मला मराठी वाचता येत नाही”. तिचे उद्गार ऐकून मी थक्क झाले. तो माणूस अडाणी म्हणून वाचू शकत नाही; ही मुलगी शिकलेली असून वाचू शकत नाही.

                                  मराठी मुलगी, आई-वडील सुशिक्षित, मराठी संस्कारात वाढलेली; पण इंग्रजी माध्यमात शिकल्याने इंग्रजी कामापुरते बोलू शकते. मराठी बोलता येते पण लिहिता - वाचता येत नाही. एकंदरीत ह्या पिढीला कोणत्याच भाषेची सखोल माहिती दिसत नाही. कोणत्याही भाषेला साहित्य असते. ह्या साहित्यात लेख, कादंबरी, नाटक, काव्य असे प्रकार असतात. ह्या प्रकारातील भाषाशैली, विचारमांडणी, शब्दसंपत्ती, शब्दांची योग्यायोग्यता, त्याने सालेली लयबद्धता याने ती भाषा समृद्ध होते.

आपल्या माय मराठी विषयी सांगताना बहिणाबाई चौधरी म्हणतात,
माझी माय सरसोती। माले शिकविते बोली।
लेक बहिणाबाईच्या ।मनी किती गुपीत पेरली॥
सरसोती म्हणजे सरस्वती असलेल्या आपल्या मायबोलीला विसरुन कसे
चालेल ?

                            इतक्यात बस आली, आम्ही बसमध्ये बसलो. बसची चाके फिरु लागली आणि माझे विचारचक्र सुरु झाले. मी मनात म्हटले, “जा बाई, तू अमेरिकालाच जा. तिथेच शोभून दिसशील.” मराठीच काय कोणतीच भाषा नीट न येणाऱ्या  व्यक्तीला  भारताचा इतिहास, भूगोल, संस्कृती ह्यांची तोंड ओळख कशी होणार ? ही पिढी आमच्या भारताची आधारस्तंभ कशी होणार? पुढचे भारताचे व ह्या उगवत्या पिढीचे भवितव्य काय? विचारांच्या पलीकडे हे जग आहे.
क्रमशः
अनुप्रभा, नाशिक
टीप :-
भुक्कड = निरुद्योगी, बुभुक्षित (भुकेला, हपापलेला, गरजू )