‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’
म्हणत
श्रीगणेशाला वार्षिक निरोप देणारा दिवस - अनंतचतुर्दशी.
भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला ‘अनंताचे म्हणजे श्रीविष्णुचे
व्रत’ करावे, असे श्रीगुरुंनी सायंदेवाला सांगितले (श्रीगुरुचरित्र अध्याय
४१) आहे. श्रीगुरुचरित्रकारांनी हे व्रत कसे
करावे? ह्याची माहिती महाभारतातील कथेद्वारे अध्याय ४२मध्ये दिलेली
आहे.
अनंत
व्रत कसे करावे ?
तांबड्या रेशमी दोऱ्याच्या १४ गांठीचा अनंत करावा. तो घेऊन नदीवर यावे. शूचिर्भूत स्नान
करावे. चांगले वस्त्र नेसून, हळद कुंकू लावून, दोन नवीन कलश आणावे. तोंडाने ‘गंगा - यमुना’
म्हणत ह्या कलशांत पाणी भरावे.
पंचपल्लव-पाच प्रकारच्या वृक्षांची पाने (पिंपळ,वड,आंबा इत्यादी) रत्नासहित कलशांत घालून षोडशोपचार करून त्याचे त्वरित पूजन करावे. गंगा-यमुनेची नानाप्रकारची आरती करून, दर्भाचा शेष करून पूजा करावी. दोन कलशावर नवीन वस्त्र ठेवावे. त्या कलशापुढे शंख - पद्म पंचरंगी पुडीनी भरलेल्या रांगोळ्या काढाव्यात. दर्भाचे शेष पुजावे. शेषाची षोडशोपचारे पूजा करावी. ‘शेषशाई’ म्हणून विष्णुचे ध्यान करावे. सातफणीच्या शेषाबरोबर नेहमी विष्णु असतो, याच कारणास्तव त्याचे नाव ‘अनंत’ असे म्हणून ध्यान करावे.
पिंगट रंगाचे डोळे, चार बाहू, उजव्या हातात शंख- पद्म, डाव्या हातात चक्र व गदा अशा विष्णुमुर्तीचे ध्यान
करावे. ‘ॐ नमो भगवते’ या मंत्राचा उच्चार करून, दर्भग्रंथीची षोडशोपचारे पूजा करावी.
नवीन दोन नवे दोरे आणून ‘पुरुषसुक्त’ म्हणून पूजा करावी. ‘अतोदेवा’ मंत्र म्हणावा. षोडशोपचारे पूजा करावी. उजव्या हातात ‘संसारगव्हरेती’ मंत्र म्हणून धागा बांधावा. ‘नमस्ते वासूदेव’ मंत्र म्हणून हातातील जीर्ण गत वर्षीच्या दोऱ्याचे विसर्जन
करावे. ‘दाताच विष्णुर्भगवान’ म्हणत एक शेर गव्हात गूळ वगैरे मिसळून फळांसहित वाण द्यावे.
तसेच ब्राह्मणाला तांबूल दक्षिणेबरोबर
गव्हाची खीर द्यावी. उरलेल्या अर्ध्या खीरीचे स्वतः (व्रत
करणाऱ्या व्यक्तीने ) भोजन करावे. असे हे व्रत चौदा वर्षे करावे.
चौदा वर्षे अनंताचे व्रत पूर्ण केल्यावर, ह्या
व्रताचे उद्यापन करताना चौदा कलश दान देऊन ब्राह्मण भोजन करावे. भक्तीभावाने
उद्यापन केल्यावर, मनातील इच्छा पूर्ण होऊन चतुर्विध पुरुषार्थाचा लाभ होतो.
कृतयुगात कौंडिण्य ऋषींची पत्नी ‘सुशीला’ हिने आचरलेले ‘अनंत व्रत’ भगवान श्रीकृष्ण पांडवांना आचरण्यास सांगतात.
“अशा प्रख्यात अनंत व्रताचा धागा तू सतत बांध, तसेच ह्या व्रताची दीक्षा तुझ्या
ज्येष्ठ मुलाला (नागनाथाला)
दे”, असे श्रीगुरु सायंदेवाला सांगतात.
प्रभा आठवले, नाशिक
संकलक : श्रीगुरुचरित्र आशय-निधी
www.shrigurucharitra.com
No comments:
Post a Comment