‘लेले आक्का, लेले बाई, आत्याबाई’ अशा अनेक नावांनी
माझी आत्या प्रसिद्ध होती. कारण ती होतीच तशी, तिने आपले सगळे आयुष्य जणु दुसऱ्यासाठी समर्पित केले होते.
माझ्या आठवणींमध्ये माझी आत्या म्हणजे आमच्या घरातील एक सदस्यच होती. तिचे वेगळे असे घर नव्हते, कारण ती
विधवा होती आणि माझ्या जन्माच्या
आधीपासूनच आमच्या घरी ती रहात होती.
ती जरी
भाऊ
- भावजयीमध्ये रहात होती, तरी तिचा भार तिने त्यांच्यावर कधी पडू दिला नाही. दि. १७ ऑगस्ट १९१५ रोजी
जन्मलेल्या आत्याचे शिक्षण ७वी पर्यंत झाले होते. त्यामुळे ‘राणी भवन’ येथे ती बालवाडी शिक्षिका म्हणून तिची नेमणूक
झाली होती. नंतर तिला १लीचे वर्ग पण शिकविण्यास दिले गेले.
काही वर्षे ती ‘रिमांड-होम’
मध्ये पण शिकविण्यास जात असे. तसेच आमच्या घराजवळील लहान मुलांच्या १ली ते
४थी पर्यंतच्या शिकविण्या ती घेत असे. तिने १९४० साली ‘सृष्टी निरीक्षण’ म्हणून एक परिक्षा दिली होती.
त्या परिक्षेत तिला ५०% मार्क मिळाले होते.
घरातील सर्व
वरची कामे ती करत असे. उदा. पिण्याचे पाणी
भरणे, कपडे धुणे, कपड्यांना इस्त्री करणे.
मला आठवते की, आम्हा सर्व भावडांच्या शाळेच्या युनिफॉर्मला १५ ऑगस्ट व २६ जानेवारी ह्या दिवशी
ती इस्त्री करुन देत असे. तसेच वडील व काकांच्या
कपड्यांना आठवड्यात एकदा इस्त्री ती करत असे.
फावल्या वेळांत
शिवण काम करत असे. आम्ही दोघी बहिणी व आमच्या चुलत दोन बहिणी
ह्यांचे फ्रॉक कापड विकत आणून ती स्वतः शिवत असे. घरात दोघी वहिनी
(माझी आई व काकू) असल्यामुळे स्वयंपाकाची
वेळ तिच्यावर फारशी कधी आली नाही. परंतु अडचणीला मात्र ती स्वयंपाक करत असे.
अशा तऱ्हेने ती कधीही रिकामी बसली
नाही. आजारपण तिला माहित
नव्हते.
आमच्या घरात आम्ही
१३ माणसे रहात होतो. आम्ही सख्खे व चुलत मिळून ८ भावंडे, माझे आई-वडील काका-काकू व आमची आत्या – ‘कै. पार्वती
शंकर लिमये’.
माझ्या जन्मापासूनच
ती आमच्या घरी होती. त्यामुळे असेल पण, आत्या ही प्रत्येक घरी कुटुंबात असतेच,
असा माझा समज होता. नवरा गेल्यानंतर ती भावांच्या आधाराने राहिली. तिला स्वतःचे मूल-बाळ नव्हते.
तिची १ मुलगा व १ मुलगी अशी दोन सावत्र मुले होती. तिचा
सावत्र मुलगा वर्षातून एक-दोनदा तिला भेटायला यायचा.
काही भेट-वस्तु, साडी वगैरे
गरजेच्या वस्तू तिला देऊन जायचा. तो इंजिनिअर होता. पुण्याला मोठ्या पोस्टवर त्याला नोकरी होती. आता हयात
आहे की नाही हे मला माहीत नाही.
सावत्र
मुलीकडे मात्र ती जात असे. सावत्र मुलीची कोठुरला मोठी शेतीवाडी
होती. तिचे कुटुंब पण मोठे होते. त्या मुलीचे
आमच्या घराशी चांगले संबंध आहेत. लहानपणी आम्ही आत्याबरोबर सुट्टीत कोठुरला जात असू.
ती कधीही कुणाशी भांडली नाही. तिचा पूर्ण दिवस कामात व्यस्त असे. काही वर्षांनी शाळा वगैरे बंद झाल्यावर ती घरी कधीच स्वस्थ बसली नाही. माझ्या मोठ्या चुलत भावाने गाई-म्हशींचा धंदा सुरु केला.
गाई म्हशींचे शेण काढणे, गोठा स्वच्छ ठेवणे ह्यासारखी
कामे तिने आनंदाने केली. ह्या कामात तिला कधीही लाज किंवा
कमीपणा वाटला नाही.
आज
मला कळते की, तिने स्वतःसाठी कधीच काही घेतले नाही. नोकरी करीत होती
तरी छान-छोकी केली नाही. स्वच्छ नऊवार पातळ,
स्वतः शिवलेले पोलके, केसांचा अंबाडा, हातात फक्त घड्याळ - बस ह्या व्यतिरीक्त कुठलेही दागिने
नाही की भारीतली साडी नाही. तिची रहाणी स्वच्छ व टापटीप होती.
ती कधीही रिकाम्या हाताने नातेवाईकांकडे
जात नसे. तिचा खाऊ ठरलेला
असे. शेवपापडी, दहीवडे दत्त-जयंतीला पेढे, गोळ्या- बिस्किटे.
आम्ही घारपुरे घाटाच्या बाजूला रहात होतो, तेव्हा
ती रोज पायी रविवार कारंजा येथील तेल्या रामाच्या दर्शनाला जाई व घरी परताना घरच्या
देवासाठी फुलपुडा घेऊन येत असे.
अशा ह्या शांत
स्वभावाच्या कष्टाळू आणि प्रेमळ आत्याला मी कधीही विसरु शकत नाही.
सौ. सुरेखा खरे
इंदिरा नगर,नाशिक
No comments:
Post a Comment