Saturday, 28 May 2016

‘कमला’ - पुस्तक परिचय

                  इसवी सन १८९५ मध्ये  ‘कृपाबाई सत्यनादन’ ह्या मराठी विदुषीने ‘कमला’ ही इंग्रजी कादंबरी लिहिली. राजहंस प्रकाशन, पुणे यांनी  ‘रोहिणी तुकदेव लिखित’ मराठी अनुवाद २०१२ साली प्रकाशित केला. रोहिणीताईंच्या भावस्पर्शी भाषेतून कृपाबाईंची कादंबरी  वाचकाला अंतर्मुख करते.

                लेखिका कृपाबाईंचा जन्म ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या, ‘हरिपंत व राधाबाई’ ह्या दांपत्याच्या पोटी दि. १४ फेब्रुवारी १८६२ रोजी अहमदनगर येथे झाला. बुद्धिमत्तेचे वरदान लाभलेल्या कृपाबाईंचा विवाह सॅम्युएल सत्यनादन यांच्याशी इसवी सन १८८१ मध्ये झाला. विवाहानंतर पतीबरोबर उटकमंडला गेल्यानंतर, कृपाबाईंनी उटीला मुस्लीम मुलींची शाळा काढली.
                 ‘अॅन इंडियन लेडी’ ह्या टोपणनावाने ‘साउथ इंडियन ऑब्झर्वर’, ‘नॅशनल इंडियन जर्नल’ यांसारख्या नियतकालिकांमध्ये लेखन करणाऱ्या कृपाबाईंची ‘कमला’ कादंबरी १८९३-९४, दरम्यान मद्रास ख्रिश्चन मॅगझिनमध्ये क्रमशः प्रकाशित झाली. खूप तापामध्ये अंथरुणाला खिळून असतानाही कृपाबाईंनी ही कादंबरी ‘कनूर’ मुक्कामी पूर्ण केली.
                   धर्माने ख्रिश्चन, कर्माने मुस्लिम मुलींना शिक्षण देणाऱ्या कार्यकर्त्या, असलेल्या कृपाबाईंनी २००वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रातील हिंदूसमाजाचे दर्शन ‘कमला’ कादंबरीद्वारे आपल्याला घडविले आहे.

                     २०० वर्षांपूर्वी ‘कमला’ ह्या कथानायिकेच्या विचारांमधून व्यक्त होणाऱ्या कृपाबाई, २१ व्या शतकातील समाजाला मार्गदर्शन करीत आहेत असे वाटते. ह्या कादंबरीत नाशिक जिल्हातील गंगागोदावरीच्या सान्निध्यातील ‘शिवगंगा’ ह्या काल्पनिक नगरात रहाणाऱ्या कमला नामक सासुरवाशीणीची कथा आकार घेते.
              कमलेचे साधे सरळ बालपण गंगागोदावरी उगमस्थानाजवळ असलेल्या एका टेकडीवरच. ह्या ठिकाणाचे लेखिकेने केलेले स्वर्गीय निसर्गाची अनुभुती देणारे वर्णन  काळाच्या ओघात  आपण गमावून बसल्याची खंत मनाला स्पर्श करते.
                कमला तान्ही असताना कृष्णाक्षेत्री तिची आई देवाघरी जाते. पत्नीविरहातून कमलाचे वडिल नारायणबुवा संन्यस्त वृत्तीने लेकीसहित गोदावरी नदी उगमस्थळाजवळील टेकडीवर राहू लागतात. कृष्णाक्षेत्री घडलेला इतिहास माहित नसलेल्या शिवनगरातील  मुलींचे ‘संन्यास्याची मुलगी’ असे टोमणे, कुचेष्टा जत्रेच्या वेळेला कमलेच्या वाटेला येते. ह्या बायकांमध्ये कमलेला नाव ठेवण्यात गंगी व तिची आई आघाडीवर असतात. जंगलातील पारंपारिक पद्धतीने सजलेली कमला, नगरवासीयांचा चेष्टेचा विषय होते.
                   चेष्टा करणाऱ्या गंगीच्या भावाशी कमलेचे लग्न ठरते.  त्याच दिवशी ‘रामचंद्र’ नारायणबुवांना येऊन भेटतो. कमलेच्या आयुष्यात न डोकावता, तिला न भेटता, तिची काळजी घेण्याचे वचन नारायणबुवांना देऊन रामचंद्र निघून जातो.
                  कमलेचे लग्न शिवगंगा नगरातील काशिनाथपंतांच्या गणेशाशी होते. गरीब संन्याश्याची मुलगी असलेल्या, कमलेच्या विरोधात बोलणाऱ्या गंगी व तिच्या आईची कमला सून होते. कादंबरीत हिंदू पद्धतीने केलेल्या लग्नसमारंभाचे यथार्थ वर्णन आढळते.
             शहरात इंग्रजी शिकणारा ‘गणेश’ बायकोचे नाव घेताना म्हणतो,
“ताऱ्यात ताऱ्यात माणके, फूलात सर्वश्रेष्ठ फूल कमल, माझी पत्नी”
उखाणा ऐकून लोक हसतात. एक म्हातारी बाई म्हणते, “ताऱ्यात माणकं कुणी कधी पाहिली आहेत काय ? आणि फुलात सर्वश्रेष्ठ फूल गुलाब, तुझे कमळ नव्हे.”
              थोडक्यात इंग्रजी शिकून व्यवहारज्ञान येत नाही हे लेखिकेने येथे नकळत दाखवून दिलेले दिसते.
               कमला उखाण्यात नवऱ्याचे नाव गुंफते.२००वर्षांपूर्वीच्या समाजाला धक्का बसतो. लोक तिला बेमूर्वत पत्नी समजतात.
          वडिलांकडून धुळाक्षर शिकलेल्या कमलाला लिहिता-वाचता येत असते.

                   लग्नानंतर आपल्या सासऱ्यांना अध्ययनात-वाचनात मदत करणारी कमला, मामंजींचा कौतुकाचा विषय होते. कमलाशी सासूबाई सुरवातीला प्रेमाने वागतात.
                     कमलेचे अस्तित्व गंगीला (कमलेच्या नणंदेला) खुपू लागते. गंगीच्या कान भरण्याने, कमलचा सासुरवास सुरु होतो. सासरे अलिप्त होतात. २ वर्षांनी इंग्रजी शिक्षण पूर्ण करुन आलेला गणेश, सुरवातीला कमलला इंग्लिश शिकविण्यास सुरवात करतो.  घरातील वातावरण बघून आईला खूष करण्याचा स्वार्थी विचार करुन कमलपासून अलिप्त होतो.
                        पुढील आयुष्यात गंगी लग्न होऊन निघून जाते, पण तिने पेरलेली कटुता कमी न होता वाढत जाते. कमलला गणेशच्या आयुष्यातून दूर करण्याच्या हेतूने, गणेशला कमलचा नणदोई (मोठ्या नणंदेचा नवरा) स ई नावाच्या नर्तकीच्या जाळ्यात अडकवितो.
                       अशी ही कमल, गणेश, सई, रामचंद्र ह्या चार पात्रांभोवती फिरणारी कथा आजच्या २१व्या शतकात घडाणाऱ्या घटनेची गोष्ट आहे, असे वाटते.
                         सईच्या नादाने गणेश स्वतःच्या बायकोवर व्यभिचाराचा आरोप करतो. कथेची नायिका असलेली कमल स्वतःचा आत्मसन्मान जपते. पतीचा त्याग करुन सासू सासऱ्यांकडे मुलासहित परत येते.
                कमलच्या वडिलांना देवाज्ञा होते. नारायणबुवांच्या संन्यस्त्य वृत्तीने त्यांनी असलेल्या संपत्तिचा उपभोग घेतलेला नसतो. हे धन कमलला मिळणार आहे, ही बातमी सासरी समजते. पैसेवाल्या सूनेचे सासरी स्वागत होते. आयुष्यात एकाकी पडलेला गणेश, कॉलऱ्याच्या साथीत पंचत्वात विलीन होतो. “आपण पतीला अव्हेरल्यामुळे, त्याचे आयुष्य संपले”; असे विचार कमलच्या मनात यायला लागतात.
                           दोन वर्षे सर्व स्थिरस्थावर झाल्यावर ‘रामचंद्र’ कमलकडे तिच्या आईची संपती घेऊन येतो. तिच्यासमोर आपले प्रेम व्यक्त करुन, ह्या रुढीपरंपरांच्या बंधनातून मुक्त हो. आपण आपले वेगळे विश्व उभारुया. या कानाच त्या कानाला कळणार नाही, अशी मागणी घालतो.
                        दोनशे वर्षांपूर्वी पारंपारिक चौकटीतून बाहेर पडून नवऱ्याचा त्याग करणारी नायिका, रामचंद्राची मागणी नाकारुन, सामाजिक बांधिलकी जपण्याचा मार्ग स्वीकारते. कमला आपली सर्व संपत्ती परोपकारार्थ खर्च करते. आपले सर्व उर्वरित आयुष्य विधवांच्या आणि अनाथांच्यासाठी वेचते. रामचंद्र संन्यस्त वृत्तीने जंगलात राहून, औषधपाण्या द्वारे लोकांची सेवा करतो.

                       ‘रामचंद्र व कमला’ ह्यांच्या दिव्यप्रेमाची गंधवार्ता लोकांना न कळू देणारी लेखिका, २१व्या शतकातील सैराटलेल्या समाजासमोर ‘कमला’ कथेद्वारे आदर्श ठेवते.



संदर्भ :-
ISBN No: 
 ISBN 978-81-7434-562-2
 कमला (राजहंस प्रकाशन, पुणे)
अनुवादरोहिणी तुकदेव (मूळ लेखिका: कृपाबाई सत्यनादन )

अनुप्रभा, नाशिक


॥ जय गुरुदेव दत्त॥

No comments:

Post a Comment